पिंपरी : दहावीचा आॅनलाइन निकाल लागल्याने अकरावीच्या आॅनलाइन केंद्रीय प्रवेशासाठी विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत पालकांचीही धावपळ सुरू झाली आहे. आॅनलाइन दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीस वेग आला आहे. इच्छुक कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी अनेक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशी अनेकांची इच्छा आहे. निकाल समजल्याने कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार हे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीअर्ज भरताना अशा महाविद्यालयाला पसंती दिली जात आहे. यामुळे त्या महाविद्यालयचा कट आॅफ लक्षात घेतला जात आहे. त्यानंतर उर्वरित महाविद्यालयांचा क्रम निश्चित केला जात आहे. या नोंदीनंतर अर्ज अंतिम करण्यात येणार आहेत. या काळात टप्पा एकमध्ये अपूर्ण राहिलेला भाग भरता येणार आहे. ही दुरुस्ती आॅनलाइन करता येत आहे. टप्पा १ व टप्पा २ पूर्ण झाल्यानंतर तो अंतिम राहणार आहे. पिंपरीतील जयहिंद महाविद्यालय, भोसरीतील भैरवनाथ महाविद्यालय, पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र महाविद्यालय, संत तुकारामनगर येथील भारतीय जैन महाविद्यालय येथे पिंपरी आणि भोसरी विभागातील नोंदणी केली जात आहे. आकुर्डीतील म्हाळसाकांत महाविद्यालय, चिंचवड येथील फत्तेचंद जैन महाविद्यालय आणि ताराबाई मुथा महाविद्यालयात नोंदणीसाठी विद्यार्थी गर्दी करीत आहेत. तसेच, सायबर कॅफेत किंवा घरातून आॅनलाइन नोंदणी केली जात आहे. इतर बोर्डातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन नोंदणीसाठी जयहिंद महाविद्यालयात मार्गदर्शन केले जात आहे. (प्रतिनिधी)
दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीसाठी धावपळ
By admin | Updated: June 11, 2015 06:09 IST