पुणे : शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा. या मागणीसाठी देशव्यापी शेतकरी आंदोलन गेले ६० दिवस चालू आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करत आहेत. यात आजवर १५२ आंदोलक शहीद झाले आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कामगार-सामाजिक संघटना, राजकीय पक्ष विविध प्रकारची आंदोलने करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची संघर्ष कहाणी या तरुणांनी सांगितली.
खाजगीकरण टाळा शेतकरी वाचवाचे फलक, संघटनेचे झेंडे, अनेक ठिकाणी लंगर, आंदोलनात पाण्याचा मारा-बॅरिगेट्स-पोलीस यांना सामोरे जाणे अशा गोष्टी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात पाहायला मिळाल्या, असे अनुभव शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या पुण्यातील तरुण शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोकायतच्या वतीने शेतकरी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी तरुणांचे अनुभव कथन याविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
दिल्लीतील सिंघू, टिकरी व गाझी सीमेवर सुरू असणाऱ्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी व सहभागी होण्यासाठी पुण्यातील २६ तरुण गेले होते. त्यामध्ये नोकरदार, इंजिनिअर, शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांचा समावेश होता.
विमल कुंडलिक म्हणाले, शेतकरी आंदोलनात शेतकरी महिलाही सहभागी झाल्या आहेत. शेकडो किलोमीटरवरून येऊन त्या बॉर्डरवर बसल्या आहेत. त्यांच्या घरी नवरा शेती सांभाळत आहे. या महिला मुलींना घेऊन सहभागी झाल्या आहेत. पंजाबमधील जे शेतकरी आंदोलनात आले आहेत. त्यांच्या महिला गावाकडे आत्मविश्वासाने काम करत आहेत.
---
दिल्लीत सर्व सुखसोयी उपलब्ध करून आंदोलन चालू ठेवले आहे. शेतकरी संघटनांकडून झेंडे, कॉर्पोरेट भागाओ किसान बचाओ असे मजकूर लिहिलेले फलक, शेतकऱ्यांकडे दिसून आले. शेतकरी एकमेकांना सहकार्य करून शांततेत आंदोलन करत आहेत. कार्टून्स, डिझाइन, च्या माध्यमातून अनेक अडचणींना तोंड देत शेतकरी विजयी झाला, असे दाखवण्यात आले आहे.
- गीतांजली प्रकाश, सहभागी आंदोलक
---
आंदोलनात येथील गुरुद्वाराकडून लंगर चालू केले आहे. शेतकऱ्यांबरोबर अनेक गरजू नागरिकही त्याचा लाभ घेत आहेत. एक महिन्याच्या आंदोलनात गरीब आणि कष्टकरी लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटला आहे. यावरून शेतकरी अन्नदाता असल्याचा संदेश समाजात पोहोचत आहे. शेतकरी आंदोलनात येणाऱ्या सरकारी अडथळ्यांनाही सामोरे जात आहे. तरुण पिढीसोबत ज्येष्ठही यामध्ये सहभागी झाले आहेत.
- कल्याणी दुर्गा रवींद्र, सहभागी आंदोलक