पुणे : ५०० व १०००च्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर बँकांसमोर रीघ लावणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी मेसेजद्वारे अपडेट करून बँकांनी उत्तम कामगिरी बजावली. राष्ट्रीय बँकांसह सर्वांचेच मेसेज खातेदारांना दिवसभर मिळत असल्याने त्यांचा गोंधळ उडाला नाही व त्यांना दिलासा मिळाला. नव्या नोटा हातात पडेपर्यंत नागरिकांना अनेक प्रश्न व समस्यांनी वेढलेले आहे. अशा परिस्थितीत बँकांनी चांगली भूमिका बजावली असून नागरिकांच्या मदतीला सर्वजण तत्पर असल्याचे दिसून आले. अतिरिक्त भरणा कक्ष, बँकांचे वाढविलेले कामाचे तास, शनिवार, रविवारच्या रद्द सुट्ट्या याबरोबर फार्म भरणे, किंवा इतर शंका सोडविण्यासाठी अतिरिक्त ग्राहक प्रतिनिधीचीही नेमणूक करण्यात आली आहे. घाबरू नका... शांत रहा..... दक्षता घ्या यांसारखे संदेश पाठवून ग्राहकांना धीर दिला जात होता. भरणा किंवा पैसे काढण्याबाबत एसएमएस माहिती दिली जात होती. आमचे एटीएम आजपासून सुविधा देतील. याबरोबरच बँक आॅफ महाराष्ट्र, स्टेट बँक, इंडियन बँक या व इतर बँकांनी त्यांच्या वेबसाइटवर सर्व सूचना, नियम टाकून ग्राहकांना धीर दिला आहे. ए.टी.एम. शुल्कही ३० डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आले आहे. याबरोबरच नवीन ग्राहकांनी केवायसीची पूर्तता करताच नवीन खाते उघडण्याचीही सुविधा देऊ केली आहे. व्यापाऱ्यांना डेबिट, के्रडिट, पी.ओ.एस. मशिन ही लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जात आहे, अशी माहिती विविध बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
'कम्युनिकेशन'ने दिलासा
By admin | Updated: November 12, 2016 07:11 IST