राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) येथे महावितरणच्या ‘आकडामुक्त गाव’ करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागात कमीत कमी कागदपत्रे घेऊन अल्पदरात दिलेल्या वीजजोड उपक्रमास ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे यांनी दिली.या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने तालुक्यातील इतर गावांतही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डोंबाळे यांनी सांगितले. राजेगावमध्ये एकाच दिवसात विक्रमी ३१0 नागरिकांना घरपोच घरगुती वीजजोड देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना वीजजोड घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नवीन वीजजोड घेण्यासाठी तालुक्याच्या गावाला अनेक हेलपाटे मारावे लागतात. अनेक कागदपत्रे मिळवताना नागरिक मेटाकुटीला येतात. त्यामुळे इच्छा असूनही ग्राहक वीजजोडपासून वंचित राहतो. याचा विचार करून महावितरणने ज्या त्या गावातच कमीत कमी कागदपत्रे म्हणजे फक्त ओळखपत्र घेऊन अल्पदरात प्रत्यक्ष घरपोच सेवा उपलब्ध करून वीजजोड देण्याचा उपक्रम हाती घेतला असून, त्याला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. फक्त ओळखपत्र व अल्पदरात घरपोच वीजजोड मिळाल्याने लोकांना हेलपाटे मारावे लागत नाहीत. लोकांच्या मनात महावितरणची प्रतिमा बदलली.(वार्ताहर)
राजेगावला एकाच दिवसात ३१0 घरगुती वीजजोड
By admin | Updated: September 7, 2016 01:29 IST