डिंभे : भातपीक पेरणीसाठी यंदा रोहिणीची वाफ लागलीच नाही. मृग नक्षत्र कोरडे जाऊ लागले आहे. धूळवाफेवर शेतकऱ्यांनी केलेल्या भातपेरण्या फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसागणिक भातपेरण्या लांबत चालल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले असून, पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या सुमारे ६४,६०० हेक्टरभात भातक्षेत्राला यंदा मृगनक्षत्रातही भातपेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा व पुरंदर हे तालुके भातशेतीचे आगार समजले जातात. या भागातील विशेषकरून सह्याद्रीच्या पर्वतरांगातील आदिवासी शेतकऱ्यांकडून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भातशेती केली जाते. भातशेती हीच या शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार आहे. पुणे जिल्ह्यात अनुक्रमे आंबेगाव तालुका-५५०० हेक्टर, जुन्नर-९३००, मावळ-९७००, भोर-७५००, वेल्हा-६०००, हवेली-२८००, खेड-६७००, मुळशी-१५७०० व पुरंदर-१४०० हेक्टर एवढे भातक्षेत्र आहे. भातपिकाच्या तयारीसाठी या तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनी भाजणीपासून पेरणी, लागवडी ते भातपीक काढणीपर्यंत विविध कामे करावी लागतात. भातशेतीसाठी या पिकाची पेरणी व लागवड वेळेत झाल्या, तरच या शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आसते.दर वर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्रातच पाऊस पडेल, या आशेवर धूळवाफेवर भातपिकाची पेरणी करतात. या नक्षत्रात पाऊस झाल्यास रोहिणीची वाफ लागली. यंदा भातपीक चांगले येणार, असा शेतकऱ्यांमध्ये संकेत आहे. यालाच रोहिणीची वाफ म्हणतात. रोहिणी नक्षत्राची वाफ लागल्यास भातरोपे वेळेत उगवून लागवडीसाठीही वेळेत होतात. रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेलच, या आशेवर जुनेजाणते शेतकरी भातपिकाच्या पेरण्या करताना पाहावयास मिळतात. यंदाही जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, भोर, मुळशीतील काही शेतकऱ्यांनी धूळवाफेवर भातपरण्या केल्या आहेत. परंतु, रोहिणी पूर्ण कोरडेच गेल्याने धूळवाफेवर टाकलेली रोपे पिठळून या पेरण्या फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
पावसाची दडी; भातपेरण्या संकटात
By admin | Updated: June 12, 2014 05:29 IST