जेजुरी : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त कामे झालेली असून, सरासरी एवढे पर्जन्यमान राहिले, तर सुमारे ३८० कोटी लिटर पाणीसाठा होऊ शकेल, अशी खात्री पुरंदरचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुरंदर तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात दिवे, सोनोरी, पानवडी, वाल्हे, नावळी, पिंगोरी, साकुर्डे, वाळुंज, गुळुंचे, एखतपूर, सटलवाडी, काळदरी, देवडी, भिवडी, मांढर, टेकवडी, नवलेवाडी, परिंचे, तक्रारवाडी, शिवरी, पांडेश्वर, सिंगापूर या बावीस गावांतून जलयुक्त शिवारअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. पाझर तलाव, नाले, ओढे खोलीकरणाची कामे लोकसहभागातून झाली आहेत. शासनाचे कृषी विभाग, लघुसिंचन, छोटे पाटबंधारे विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण या सर्व यंत्रणांमार्फत या बावीस गावांचा ६० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात ४७ कोटी रुपये खर्चाची ७४७ कामे हाती घेण्यात आली होती. पैकी ५५७ कामे सुरू असून, यातील ४३२ कामे पूर्ण झालेली आहेत. तर, १२५ कामे सुरू आहेत. यासाठी आतापर्यंत सुमारे १७ कोटी ३३ लाख रुपये खर्च झालेला आहे. यातून १७ लाख ४२ हजार घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. यामुळे या वर्षी ३८० कोटी लिटर पाणीसाठा होऊ शकतो. अजून खूप कामे होणार आहेत. याशिवाय या वर्षीही सण २०१६-२०१७ या वर्षात अजून २३ गावांचा समावेश या योजनेत केलेला आहे. यात बेलसर, पांगारे, पिंपरी, खळद, घेरापुरंदर, आसकरवाडी, कोळविहिरे, हरणी, खानवडी, दौंडज, राख, नायगाव, माळशिरस, भिवरी, वनपुरी, पिसुर्टी, कर्नलवाडी, गराडे, कोडीत, कोथळे, पिसर्वे, पोंढे, बोर्हारळवाडी या गावांचा समावेश असून, या गावासाठी साधारणपणे ४४ कोटी ९२ लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या खर्चातून सुमारे २२०० कामे प्रस्तावित करण्यात आलेली असून, एप्रिलपासून याही कामांना सुरुवात केली जाणार आहे, असेही तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. >पुणे जिल्ह्याचा विचार करता सर्वांत जास्त काम पुरंदर तालुक्यात झालेले असून, पावसाळ्यात पर्जन्यमान जर व्यवस्थित राहिले, तर मोठा पाणीसाठा होऊ शकतो.जेथे ही कामे झालेली आहेत त्या ठिकाणी किमान दोन वर्षे पाणीटंचाई जाणवणार नाही, असा दावाही ढगे यांनी केला आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत काम करण्यासाठी गावागावांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकसहभाग, संस्था, कंपन्याही या कामासाठी सहकार्य करीत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. अशाच प्रकारचा सहभाग व प्रतिसाद लाभला. यामुळेच मोठ्या प्रमाणावर काम होऊ शकले.