पुणे : धरणातील पाण्याने तळ गाठला, त्यामुळे पाणी विषाणूजन्य झाले. पुणेकरांना असे आजाराच्या उंबरठ्यावर आणून ठेवण्याला धरणातून पाणी सोडणारे पालकमंत्री गिरीश बापटच जबाबदार आहेत, असा आरोप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने सोमवारी केला. भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी ‘सत्ता तुमची आहे, पाणी विषाणूजन्य झाले असेल तर तुम्ही झोपा काढीत होता काय’ असा सवाल करीत त्यांना प्रत्युत्तर दिले.सभागृह नेते बंडू केमसे यांनी पाण्याचे नमुनेच सभागृहात आणले होते. ते दाखवत त्यांनी या पाण्यात नारू या आजाराचे जंतू असल्याचे सांगितले. ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे, असे पालकमंत्री सांगत होते, दौंड, इंदापूरला पाणी सोडू नका असे आम्ही सांगत होतो; पण त्यांनी ऐकले नाही. आता पाण्याने तळ गाठला. शुद्धीकरण केल्यानंतरही प्रदूषित पाणी पुण्यात यायला लागले, असे केमसे म्हणाले. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘धरणातून सोडलेल्या पाण्याचा वापर दौंड, इंदापूर येथील बाटलीबंद पाणीविक्री करणाऱ्या कंपन्यांनी केला. शेतीसाठी ते पाणी उचलले गेले. असे होऊ नये यासाठीच टँकरमधून पाणी पुरवा, अशी मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता पाण्यात जंतू येत असतील व त्यामुळे आजार वाढत असतील तर त्याला जबाबदार पालकमंत्रीच आहेत.’’ नारूचा उल्लेख करून केमसे पुणेकरांमध्ये विनाकारण घबराट पसरवत आहेत, असे बिडकर म्हणाले, तर मुक्ता टिळक यांनी, सभागृह नेते काय बोलत आहेत हे त्यांनाच कळत नाही, अशी टीका केली. डॉ. धेंडे यांनी महापालिकेच्या पाण्याचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था तपासून देत नसल्याची तक्रार केली़ कमल व्यवहारे, बाळा शेडगे, दिलीप बराटे, उषा कळमकर, विकास दांगट, मनसेचे गटनेते किशोर शिंदे यांनी या चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)क्लोरिनच्या जादा वापराने आजारपाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी खुलासा केला. धरणातील पाण्यात सायक्लन (अळ्या) झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शहरात पोहोचलेले पाणी स्वच्छ व शुद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये सध्या नेहमीपेक्षा जास्त क्लोरिन डोस वापरून पाणी शुद्ध केले जाते. त्यावरही शिंदे, केमसे यांनी आक्षेप घेतला व जादा क्लोरिनचा वापर केल्यामुळेही आजार होतात, असे म्हणत त्यालाही पालकमंत्रीच जबाबदार असल्याचा पुन्हा आरोप केला. भाजपच्या सदस्यांनी चिडून त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका, असे सुनावले.धरणातील पाण्याची स्थिती खरेच गंभीर आहे. पाण्याने तळ गाठला असल्याने प्रदूषित पाणी येणे शक्य आहे, त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महापौर प्रशांत जगताप यांनी केली. त्यावर गॅसची सबसिडी केंद्र सरकारने काढून घेतल्यामुळे पाणी उकळण्याचा खर्च कसा करायचा, असा सवाल करीत अरविंद शिंदे यांनी पुन्हा भाजपवर टीका केली.
पुण्याचे पाणी विषाणूजन्य!
By admin | Updated: June 21, 2016 00:44 IST