बारामती : पोलीस भरतीसाठी युवकांकडून कसून सराव सुरू असतानाच एसआरपी (राज्य राखीव पोलीस दल) भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र पोलीस अंतर्गतच असणाऱ्या एसआरपी व आयआरबीची भरती प्रक्रिया स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील भरती प्रक्रियेदरम्यान राज्यात वेगवेगळ्या भागात ५ युवकांना प्राण गमवावे लागले होते. यावर एका स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर राज्य शासनाने पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल केले. पुरुष उमेदवारासाठी असणारी ५ किमी धावण्याची मर्यादा १६०० मीटर करण्यात आली, तर महिला उमेदवारांसाठी हे अंतर ३ किमीवरून ८०० मीटरवर आणले. मात्र, महाराष्ट्र पोलीस अंतर्गतच असणाऱ्या एसआरपी भरती प्रक्रियेबाबतचे नियम ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, परिपत्रक आणि भरती विभागाच्या संकेतस्थळावरही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे एसआरपी आणि आयआरबीच्या उमेदवारांना मागील नियमानुसारच भरतीसाठी उतरावे लागणार का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शासनाने एसआरपीची भरती प्रक्रिया स्पष्ट करावी. परिणामी, उमेदवारांमधील संभ्रम दूर होण्यात मदत होईल, असे येथील सह्याद्री करिअर अॅकॅडमीचे उमेश रूपनवर यांनी सांगितले.
एसआरपी भरतीबाबत संभ्रमावस्था
By admin | Updated: February 8, 2016 02:08 IST