पुणे : पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकार्यांनी तक्रारींची दखल न घेतल्यास त्याविरूध्द नागरिकांना थेट दाद मागता यावी म्हणून गेल्या ५ वर्षापासून पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जनता दरबार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दररोज सायंकाळी ४ वाजता पोलीस आयुक्त स्वत: नागरिकांना भेटून त्यांच्या तक्रारी जाणून घेत असत. मात्र पोलीस आयुक्त म्हणून सतीश माथूर यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी या जनता दरबारामध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे. नागरिकांना पोलीस अधिकारी व कर्मचार्यांकडून व्यवस्थित वागणूक न मिळत असल्याच्या वारंवार तक्रारी पोलीस आयुक्तांकडे येत होत्या. यापार्श्वभुमीवर तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी जनता दरबार सुरू केला. त्यांची बदली झाल्यानंतर मीरा बोरवणकर व गुलाबराव पोळ यांनी हा उपक्रम पुढे सुरू ठेवला होता. थेट आयुक्तांना भेटून आपले गार्हाणे मांडता येत असल्याने नागरिकांना या उपक्रमाचा मोठा फायदा होत होता. नागरिकांच्या तक्रार अर्जानुसार लगेच संबंधित पोलीस अधिकार्यास फोन शहानिशा केली जात होती. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होत होती. पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचार्यांवर जनता दरबाराचा मोठा वचक निर्माण झाला होता. गुलाबराव पोळ यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बदली झाल्यानंतर सतीश माथूर पुण्यात बदलून आले. मात्र त्यांनी जनता दरबारामध्ये सहभागी होणे टाळले आहे. आयुक्तांना भेटण्यासाठी पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जनता दरबारामध्ये तक्रारी ऐकूण घेण्याचे काम पोलीस उपायुक्त किंवा सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांना सांगण्यात आले आहे. त्यांच्या समकक्ष असणार्या अधिकार्यांबदद्ल नागरिकांनी तक्रारी केल्यास ते यास न्याय देऊ शकतील का असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. तसेच त्यामुळे जनता दरबाराचे महत्त्वच संपुष्टात आले आहे.दरबार राजाचा असतोपोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 'जनता दरबार ही संकल्पनाच मला मान्य नाही, दरबार हा राजाचा असतो. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये मी नागरिकांना भेटण्यासाठी नेहमी उपलब्ध असतो. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे भेटून मी त्यांचे म्हणणे ऐकून घेतो.'
पोलीस आयुक्तांचा जनता दरबार बंद?
By admin | Updated: June 10, 2014 23:34 IST