पुणे : पीएमपी प्रवाशांना थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या बसथांब्यांवर प्रवाशांनी थांबणे अपेक्षित असताना हे बसथांबे चक्क पार्किंगसाठी वापरले जात आहे. शहराचा मध्यवर्ती भाग तसेच उपनगरांमध्ये हे बसथांबे पार्किंग थांबे बनल्याने नागरिकांना बस मिळविण्यासाठी भर रस्त्यात थांबावे लागत असून, या अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर ना पीएमपी कारवाई करत आहे ना वाहतूक पोलीस. त्यामुळे हे बसथांबे काढून तरी टाका, अशा संतापजनक भावना हे प्रवासी व्यक्त करत आहेत.प्रवाशांच्या सुविधांसाठी पीएमपीकडून शहरात ठिकठिकाणी बसथांबे उभारण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने प्रशासनाकडून हे थांबे पदपथावर उभारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी थांबणाऱ्या बसेस रस्त्यावर थांबल्यास वाहतूककोंडी होऊ नये म्हणून त्याच्यासमोर बस थांबण्यासाठी दिशादर्शक पट्टे रस्त्यावर मारण्यात आले आहेत. मात्र, शहरात ज्या ठिकाणी नियमित वर्दळ आहे, तसेच पार्किंगसाठी जागा मिळत नाही, त्या ठिकाणी चक्क या बसथांब्यांवर अतिक्रमण करण्यात आले असून, थेट प्रवासी थांबण्याच्या जागेवरच वाहने पार्क केली जात आहे. विशेष म्हणजे या दुचाकी, चारचाकी, तर त्यात कमी म्हणून काय की रिक्षा थांबेही त्याच ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. या वाहनांच्या आड प्रवासी थांबल्यास बसचालकाला अनेकदा ते दिसत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी अशी पार्किंग केली आहे, त्या ठिकाणी न थांबता प्रवासी थेट रस्त्याच्या मध्यभागीच जीव मुठीत घेऊन थांबत आहेत. तर दुसरीकडे भर वर्दळीच्या रस्त्यावर प्रवासी घेण्यासाठी पीएमपी बस रस्त्याच्या मधोमध थांबत असल्याने वाहतूककोंडी होऊन अपघातांना सामोरे जावे लागत आहे.कारवाई कोण करणार? शहरात कोठेही वाहतुकीस अडथळा झाला तर त्यावर तोडगा काढण्याची तसेच जबाबदार घटकांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे असते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्षात केवळ ज्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत, त्याच ठिकाणी कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारे बसथांब्यांवर गाड्या लावल्याने एक प्रकारे वाहतूककोंडी तसेच वाहतुकीसही अडथळा होतो. त्यामुळे अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र, काही बसथांब्यांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणीही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. तर ज्या पीएमपीचे हे प्रवासी आहेत, त्यांच्या या गैरसोयीकडे लक्ष देण्यासाठी पीएमपीलाही वेळ नाही. त्यामुळे अशा अनधिकृत पार्किंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पीएमपीचे बसथांबे बनले वाहनतळ
By admin | Updated: February 2, 2016 01:35 IST