पुणे : ज्ञानपीठसारख्या मोठ्या पुरस्कारांमध्ये मराठी साहित्यिक मागे पडण्याचे कारण म्हणजे मराठी साहित्यिकांना इंग्रजी भाषेची अडचण होते. साहित्यिकांना इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे जरुरीचे आहे. जेणेकरून मराठी साहित्य संपूर्ण जगभर प्रसिद्ध होईल, असे परखड मत विश्व मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांना डॉ. शेषराव मोरे यांच्या हस्ते सोमवारी प्रदान करण्यात आला. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. त्या वेळी मोरे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह डॉ. कल्याणी दिवेकर, प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.मोरे म्हणाले, ‘‘पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालू नये. १०वीपर्यंत इंग्रजी भाषेची गरज नाही. कारण मूलभूत गोष्टी समजण्यासाठी मातृभाषेचीच गरज असते. त्याशिवाय आपल्याला साहित्याची ओळख होणार नाही. मात्र, ११वीनंतर इंग्रजी भाषेचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे. जगभरातील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी व मराठी साहित्याला देशभर पोचविण्यासाठी इंग्रजी भाषेची गरज आहे.’’ (प्रतिनिधी)
....तरच जगात मराठी पोहोचेल
By admin | Updated: August 18, 2015 03:53 IST