पुणे : पदाला हपापले असतात असे आयाराम-गयारामांचा कुठलाही सत्ताधारी पक्ष असला की तिकडे जातात. आम्ही सत्तेत असताना अशीच एक चुक झाली..पण नंतर मात्र मी कानाला खडा लावला असे मत व्यक्त करताना सध्या काही पक्षांची कोणाला घेऊ, कोणाला नको अश्ी स्थिती असल्याने गुंडांचे प्रवेश होत असल्याचा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला. पोलिस आयुक्त, एस.पी ला एक फोन केला तर पक्षात येणाऱ्यांचे रेकॉर्ड पाच मिनिटांत उपलब्ध होते, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुलाखती सुरु आहेत. या वेळी पवार पत्रकारांशी बोलत होते. मुळशी तालुक्यातील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार यांचा नुकताच पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यापार्श्वभूमीवर पवार म्हणाले,‘‘ सत्ताधारी कोणताही पक्ष असल्यावर त्या पक्षात प्रवेश करणा-यांचे प्रमाण अधिक असते. पदासाठी हापापलेले पक्षांतर करतात. निष्ठावान कार्यकर्ता असे कधीच करत नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारे गुंडाचे प्रवेश ही राजकारणाला लागलेली कीड आहे. भाजप सध्या सर्रास सर्वांना उमेदवारी देऊ सांगून पक्ष प्रवेश करून घेत आहे. परंतु उमेदवारी देताना निष्ठावंताना डावलून आयात व्यक्तीला उमेदवारी दिल्यास अनेक अडचणी निर्माण होतात.’’ टाळी वाजवायला तयार, पण...!महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीत टाळी वाजवायला तयार आहेत, पण सध्या तरी त्यांना कोणीच हात द्यालया पुढे येत नाही. परिस्थिती बदलली की असे होणारच असा टोला देखील अजित पवार यांनी ठाकरे यांना लावला. आझम पानसरे प्रवेशाबाबत पिंपरीतच बोलणार ४पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आझम पानसरे यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला. याबाबत अजित पवार यांना विचारले असता, पानसरे प्रवेश हा काय राज्यस्तरावरील किंवा जिल्ह्याचा विषय नाही. पानसरे यांच्या प्रवेशाबाबत दोन दिवसात पिंपरी-चिंचवड मध्ये जाऊनच काय बोलायचे ते बोलेल असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.
एक चूक झाली अन् मी कानाला खडा लावला!
By admin | Published: January 12, 2017 2:18 AM