पुणे : या वर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने वर्तवल्याने खरीप हंगाम घेण्यासाठी सज्ज झालेल्या बळीराजाला गेले दहा दिवस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत बसावे लागले. अखेर रविवारी त्याने जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हजेरी लावली आणि दिलासा दिला. सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ६.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रोहिणी नक्षत्र पावसाविना सरले, मृगही कोरडे जाऊ लागल्याने पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. धूळवाफेवर केलेल्या भातपेरण्या अडचणीत आल्या होत्या. उगवून आलेल्या रोपांचे कोंब सुकू लागले असून, जमिनीतील दाणे कोठण्याची वेळ आली आहे. यामुळे ही रोपे पाटाचे पाणी, टँकरने पाणी देऊन वाचविण्यासाठी धावपळ सुरू आहे. पावसाच्या प्रतीक्षेमुळे अजूनही निम्म्या अर्ध्या भातपेरण्या रखडल्या आहेत. यंदा रोहिणी नक्षत्र सरून मृगही संपत आला तरी आकाशात ढगांचा ठिपूस दिसत नव्हता. मृग नक्षत्राची आज समाप्ती झाली. मात्र, यापूर्वी एक दिवस अगोदर आर्द्रा नक्षत्राच्या पूर्वसंध्येला वरुणराजा बळीराजाच्या मदतीला धावून आला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांची लगबग पुन्हा सुरू झाली आहे. आणखी काही दिवस पावसात सातत्य राहिले तर जमिनीतील नांगरलेली ढेकळं भिजून पिकांच्या पेरण्यांसाठी पोषक वातावरण होईल.(प्रतिनिधी)लोणावळा परिसरात धुकेलोणावळा : लोणावळा, खंडाळा, लायन्स पॉइंट व ग्रामीण भागात सर्वत्र सोमवारी सकाळपासून धुक्याचे काहूर माजल्याने वाटा धुक्यात हरविल्या आहेत. डोंगरभागात दाट धुके पडले असून, बारीक पाऊस पडत असल्याने वातावरणात गारवा पसरला आहे.मागील दोन-तीन दिवसांपासून लोणावळ्यात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. यामुळे शहरात ढगाळ वातावरण असून, धुके पसरले होते. घाट परिसरात धुके जास्त असल्याने वाहने सावकाश चालवावी लागली.(वार्ताहर)
भात पेरण्यांसाठी पोषक पाऊस
By admin | Updated: June 21, 2016 00:20 IST