पुणे : जिल्हा परिषदेने मंगळवारी ३८ जणांना अनुकंपावर नियुक्ती दिली. यानंतर नोकरी मिळालेल्या उमेदवारांनी व त्यांच्या पालकांनी घरातले कर्तेच गेल्याने संसाराचा आडलेला गाडा आता कसाबसा रेटू शकतो, अशा प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना दिल्या. जिल्हा परिषदेत नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी किंवा मुलांना त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. आजार किंवा अपघातात घरातील कर्ती व्यक्तीच गेल्याने या कुटुंबांची मोठी परवड होत असते. पुणे जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर ४०० जागा रिक्त आहेत. ११४ जणांनी अनुकंपावर नोकरीत घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज केले होते. शासनाच्या नियमानुसार एका वर्षात १० टक्के जागा भरल्या जातात. यानुसार आज ३८ जणांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, सामान्य प्रशासनाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या उपस्थित जिल्हा परिषदेत या उमेदवारांना नोकरीचे आदेश देण्यात आले. यात तीन जणांना ग्रामसेवक, सहा जणांना वरिष्ठ सहायक, १० जणांना कनिष्ठ सहायक, सहा जणांना कनिष्ठ सहायक लेखा, आठ जणांना आरोग्यसेवक पुरुष व चार जणांना परिचर पदाची नियुक्ती दिली. चार उमेदवारांनी ते उच्चशिक्षित असल्याने नियुक्ती नाकारली आहे. परिचर पदासाठी १२ उत्तीर्ण असलेल्यांना नोकरी देण्यात आली असून इतर पदांसाठी सर्व उमेदवार उच्चशिक्षित आहेत. यात काही जणांनी अभियंता पदाची पदवीही घेतली असल्याचे सत्यजित बडे यांनी सांगितले. यात २००७चे सर्वांत जुने प्रकरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
आता आमच्या संसाराचा गाडा कसाबसा चालेल!
By admin | Updated: December 23, 2015 00:07 IST