पुणे : भारतीय जनता पक्षासमवेत आम्ही सत्तेत आहोत पण आमची बांधिलकी जनतेशी आहे, असे सांगत राज्यात सत्तेची समान हिस्सेदार असूनही भाजपावर हल्लाबोल चढविणारी शिवसेना अवघ्या वर्षभरावर आलेल्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुण्यातही आक्रमक झाली आहे. ऐन दिवाळीत वाढलेल्या तूरडाळीच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि महागाईच्या मद्ुद्यावरून शहर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या आठ आमदार आणि एका खासदाराचे वाभाडे काढण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शिवसेनेकडून ऐन अधिवेशन काळात ‘असला कारभारी नको ग बाई’ ही मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी पक्षाकडून पुढील तीन दिवस संपूर्ण शहरात पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे गेल्या वर्षभरात महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांचे प्रश्न पुढे करीत भाजपावर हल्लाबोल केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणूका २0१७ मध्ये होऊ घातल्या आहेत. त्या पूर्वी म्हणजेच मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे महापालिकेची तयारी म्हणून पाहिले जात होते. या विधानसभा निवडणुकीत गेली २५ वर्षे युतीत एकत्र असलेल्या भाजपा आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविली. या निवडणुकीत शिवसेनेला पुण्यातील हडपसर आणि कोथरूडची जागा गमवावी लागली. तर शहरातील आठही मतदार संघांमध्ये भाजपाचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले.ऐन दिवाळीत महागलेल्या डाळींचे भांडवल करीत निम्हण यांनी शहरात सरकार विरोधी सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेत शहरातील आमदारांना चक्क खोंडाची उपमा देणारे फलक लावले आहेत. तर ‘असला कारभारी नको ग बाई’ या पथनाट्याच्या माध्यमातून थेट तूरडाळीच्या मुद्द्यावरून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची खिल्लीच उडविली आहे. त्यातच शिवसेनेकडून भाजपाविरोधी घेण्यात आलेला हा आक्रमक पवित्रा ऐन विधानसभेच्या तोंडावर घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत डाळींचे गगनाला भिडलेले भाव आणि महागाई न दिसलेल्या शिवसेनेला आता महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर दिसताच भाजपाचा नाकर्तेपणा दिसू लागल्याने शिवसेनेची ही महापालिका निवडणुकीचीच रंगीत तालीम सुरू असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
असला कारभारी नको ग बाई!
By admin | Updated: December 8, 2015 00:12 IST