पुणे/पिंपरी : मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र अंदाजपत्रक असलेली रेल्वे यंदाच्या अंदाजपत्रकातून घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही ठळक बाबी वगळता रेल्वेबाबत फारशा काही घोषणा केल्या नाहीत. सर्वसामान्य प्रवाशांना अपेक्षित असलेल्या नवीन गाड्या, प्रकल्प, नवीन मार्ग अशा मुद्यांचा उल्लेख नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच रेल्वे प्रशासनही याबाबत अनभिज्ञ असून, सविस्तर माहिती मिळण्यास किमान एक-दोन दिवसांचा कालावधी लागेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले असून, दररोज सुमारे साडे तीन कोटींहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रेल्वेचे स्वतंत्र अंदाजपत्रक दरवर्षी सादर केले जात होते. यंदापासून स्वतंत्र अंदाजपत्रक बंद करण्यात आले आहे. पूर्वी रेल्वे अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित मार्ग, नवीन गाड्या, योजना, प्रकल्प, स्थानकांची सुधारणा, सुरक्षा यांसह विविध पायाभूत सुविधांचा उल्लेख ठळकपणे केला जात असे. त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चाही होत होती. प्रत्येक रेल्वे प्रवाशाला अंदाजपत्रकाची उत्सुकता असायची. मंगळवारी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये यापैकी कोणतीही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. जेटली यांनी रेल्वेबाबत काही ठळक घोषणा केल्या असल्या, तरी त्यामध्ये नव्या गाड्या, मार्गांचा समावेश नाही. याबाबत रेल्वे प्रशासनही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. रेल्वे प्रवासी, संघटनांकडून प्रशासनाकडे याबाबत विचारणा होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र, दिल्लीकडे डोळे लावून बसले होते. दिवसभरात केवळ मुख्य तरतुदींची माहिती देण्यात आली. याबाबत प्रवाशांसह संघटनांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. जेटली यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकातून काहीही बोध होत नाही.केवळ ठळक घोषणा करून रेल्वेची बोळवण करण्यात आली आहे. किमान अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर रेल्वेकडून सविस्तर माहिती प्रवाशांसाठी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. एकीकडे रेल्वेची स्वायत्तता अबाधित राखण्याची घोषणा होत असताना त्यामध्ये पारदर्शकता दिसत नाही, अशी नाराजी रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)रेल्वेबाबत नवीन अर्थसंकल्प तयार झाला आहे. त्यात स्वच्छ रेलबाबत घोषणा केली आहे. सरकारने तिसऱ्याा रेल्वेमार्गाची घोषणा केली होती, पण अजूनही काम सुरू केले नाही. मेट्रो प्रकल्पदेखील पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर तयार होत आहे. त्यामुळे निगडी, आकुर्डी, चिंचवड भागातील नागरिक या सुविधेपासून वंचित राहत आहेत. ई-तिकीटमध्ये सवलत देण्यापेक्षा रेल्वे स्थानकावर जादा तिकीट घर करून पदवीधरांना नोकरी द्यावी. - गुलामअली भालदार, चिंचवड प्रवासी संघ
शहरातून नाही नवीन रेल्वेमार्ग
By admin | Updated: February 2, 2017 03:55 IST