लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: वारंवार अपघात होत असलेल्या नवले ब्रीज रस्त्यावर वाहनांचा वेग कमी करणाऱ्या उपाययोजना त्वरीत कराव्यात, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदालन केले जाईल, असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसांना दिला.
मनसेचे योगेश खैरे, संतोष पाटील, गणेश नाईकवडे, राहूल गवळी यांनी मंगळवारी दुपारी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत मनसेच्या वतीने उपाययोजनाही सुचवण्यात आल्या. पूल उतरताना वाहनाचा वेग कमी करणारी कोणतीही यंत्रणा तिथे नाही. ती त्वरीत बसवावी. हा संपुर्ण परिसर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषीत करावा, रस्त्यावरचे अपघात कमी कसे करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी असे सांगण्यात आले.
श्रीरामे यांनी त्यांना वाहतूक विभाग करीत असलेल्या उपायांची माहिती दिली. अपघातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याने वाहतूक विभाग यावर काम करत आहे असे त्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात रस्त्यावर प्रत्यक्ष काही दिसले नाही तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.