सुरेश निडबने /वालचंदनगरकाट्याकुट्यात किंवा रानावनात राहायचं... रानातील काटेरी झाडं तोडून त्यापासून कोळसा बनवायचा... त्यातून मिळणाऱ्या तोकड्या उत्पन्नावर गुजराण करायची... जगण्याची कोणतीच नवी दिशा नाही. त्यामुळे कोळशासारखाच काळाकुट्ट अंधार कायमच समोर दाटलेला. तर आपल्या आई-बापाचा हात धरून रानोमाळ फिरणाऱ्या उमलत्या भविष्यांचासुद्धा आता कोळसाच झाला आहे. वालचंदनगर, कळंब परिसरातील नीरा नदीच्या कडेने शेकडो आदिवासी कुटुंबे आणि त्यांची मुले आज आपले भविष्य शोधत आहेत. वालचंदनगर परिसरातील कोळसा तयार करण्यासाठी आलेली ही कुटुंबे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून या आदिवासींचे सर्वेक्षण झालेलेच नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याही गावात सामावून घेतले गेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांचा विचार करण्यास शासनस्तरावरही कोणाकडे वेळ नाही. मुळात हे आदिवासी या भागात राहायला आहेत की नाही, याची कल्पनाही शासनदरबारी नाही. मग मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तर खूप लांबचा आहे, अशी व्यथा येथील बबन रामभाऊ पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. देशातील गोरगरीब अन्नविना उपाशी राहू नये. त्याला पोटभर अन्न मिळावे, यासाठी केंद्र शासनाने मागील काही वर्षांपूर्वी अन्नसुरक्षा कायदा आणला. मात्र, या आदिवासींकडे रेशनकार्डच नसल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानातील सवलतीमध्ये धान्य मिळत नाही. ४या आदिवासी कुटुंबाच्या पिढ्यान्पिढ्या अठराविश्वे दारिद्र्यात गेल्या आहेत. बबनने सांगितले, की आम्हाला ना घरदार, ना हाताला काम. त्यामुळे सरपण तोडून वाटा काढत कोळसा बनवून कुटुंब सांभाळावे लागते. ४आम्हा आदिवासींना सरकारच्या कोणत्याही सुविधा नाही. त्यामुळेच आदिवासीच म्हणून भटकंती करीत आहोत. मुलांना शाळेत पाठवण्याची इच्छा आहे; परंतु भाकरी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागते. ४एकीकडे शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी स्पर्धा लागते. त्यासाठी शिक्षकांची पळता भुई थोडी होते. मात्र येथील आदिवासी पाड्यावर शेकडो मुले रानावनात भटकंती करत आहेत. सर्वशिक्षा अभियान येथे अजूनही पोहोचले नाही.
आदिवासींच्या उमलत्या भविष्यापुढे निव्वळ अंधकार
By admin | Updated: October 7, 2016 03:49 IST