पुणे: कंत्राटी पद्धतीने अनेक वर्षे काम केल्यानंतरही कायम सेवा भरतीमध्ये डावललेल्या गेल्यामुळे संतापलेले महावितरणमधील २८ हजार कंत्राटी कामगार आता आपल्या मागण्या घेऊन मुंबईत आझाद मैदानावर धडकणार आहेत. सरकारकडे वारंवार विनंती, अर्ज, प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने हा धडक मोर्चा काढणार असल्याचे भारतीय मजदूर संघाने सांगितले.
संघाचे अध्यक्ष निलेश खरात म्हणाले, कोरोना काळात जीव धोक्यात घालून कंत्राटी कामगारांनी काम केले. त्यात २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना किमान नुकसान भरपाई देण्याची माणूसकीही महावितरणने दाखवलेली नाही. आता महावितरणमध्ये साडेसात हजार पदांची भरती आहे. त्या पदांवर या कंत्राटी कामगारांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्य द्यावे अशी मागणी आहे, मात्र सरकार ती अमान्य करत आहे. सर्व प्रकारच्या पद्धतीने सरकारकडे मागणी करून झाली, त्यामुळे आता नाईलाजाने मुंबईत सरकारसमोर आंदोलन करावे लागत आहे. विविध मागण्या घेऊन सर्व कंत्राटी कामगार १५ डिसेंबरला सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे अशी माहिती सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली.