रांजणगाव गणपती : हंगामी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात केलेल्या शेतीच्या नांगरणीची ढेकळेही अद्याप फुटलेली नाहीत. पेरणीअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्ह दिसू लागल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. नक्षत्राप्रमाणे ढोबळपणाने सात जूनला सुरू होणारा हंगामी पाऊस जुलै महिना अर्ध्यावर आला तरी अजून बरसत नसल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ निर्माण होऊ लागली आहे. सतत दुष्काळच्या छायेत गणला जाणारा शिरूर तालुका चासकमान, डिंभे धरणाच्या पाण्यामुळे सुजलाम सुफलाम होत असला तरी निसर्गातील पावसाच्या सरी बरसल्याशिवाय भूजल पातळी वाढत नाही. वेळेवर पाऊस झाला तर शेतकऱ्यांना वर्षभराचे शेतीचे नियोजन करणे सोयीचे जाते. शेतीत विविध पिके घेऊन निघालेल्या उत्पादनातून वर्षभराचे आर्थिक नियोजन करता येते. आता मात्र पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दर वर्षी खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नातून पुढील हंगामातील पिकांचे बी बियाणे, खते, पिकांवरील औषधे, शेतमजुरी भागविता येते. परंतु, या वर्षी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे पीक नियोजन कोलमडून गेले आहे. कोकण आणि मुंबईत पाऊस पडत आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.
ढेकूळही फुटेना, खरीप हंगाम धोक्यात
By admin | Updated: July 15, 2014 04:07 IST