पुणे : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या १ ते ६ फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबई येथे होत असलेल्या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शिक्षक रजेवर गेल्याने सोमवारपासून १ हजार ६७0 शाळांना कुलूप लागले होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या रजाप्रकरणी ताशेरे ओढल्यानंतर यातील काही शिक्षक शुक्रवारी शाळेत दाखल झाल्याने यातील काही शाळा सुरू झाल्याचा दावा शिक्षणाधिकारी मुश्ताख शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. अधिवेशनासाठी प्रवासाच्या दिवसासह कमाल ६ दिवसांची (१ ते ६ फेब्रुवारी २०१६ पर्यंतची) विशेष नैमित्तिक रजा शासनाने २९ जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे मंजूर केली होती. याचा फायदा घेत शिक्षकांनी रजा टाकल्या. जिल्ह्यात ३ हजार ७२९ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्यांच्यासाठी १२ हजार ६0 शिक्षक मंजूर आहेत. यातील ११ हजार ५00 शिक्षक सध्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. यातील ६ हजार ८६७ शिक्षक या परिपत्रकाचा आधार घेत रजेवर गेले. त्यामुळे १ हजार ६७0 शाळा बंद ठेवाव्या लागल्या. या शिक्षकांनी गटशिक्षक अधिकाऱ्यांना रजेचा अर्ज दिला असून, त्यांच्याकडूनच रजा मंजूर करून घेतल्या. मुळात गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात किती शाळा आहेत, यात एकशिक्षकी किती, दोनशिक्षकी किती, या शाळांवरील किती शिक्षकांनी रजा घेतली आहे याचा आढावा घेणे गरजेचे होते. मात्र सरसकट रजा मंजूर केल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या.शिक्षक मात्र, प्रत्यक्षात ६ दिवस अधिवेशनाला न जाता अनेक शिक्षक घरीच राहून सुट्टी ‘एन्जॉय’ करीत असल्याची चर्चा शाळेत उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये सध्या अघोषित सुट्टी आहे. (प्रतिनिधी)जवळपास अर्धे शिक्षक उपस्थित नसल्याने अनेक शाळा उर्वरित शिक्षक चालवीत आहेत. प्रत्यक्षात अधिवेशन २ दिवस आहे; पण त्यापूर्वीच ४ दिवस सुट्टी दिली गेली आहे.अधिवेशनासाठी उपस्थित शिक्षकांना उपस्थितीचे प्रमाणपत्र दिले जाते; पण सहकाऱ्यांची प्रमाणपत्रे प्रत्यक्ष उपस्थित राहणारे आणतात किंवा ती त्यांना पोहोचविली जातात, असे सांगितले जाते.यातील काही शिक्षक अधिवेशनाला गेले नाहीत, पण शाळेतील अनेक जण सुटीवर जाणार असतील, तर जबाबदारी आपल्यावर येईल, या धास्तीने त्यांनीही अधिवेशनाची सुट्टी घेतली. अधिवेशन सुट्टीच्या कालावधीत घेता येऊ शकते; पण त्या वेळच्या हक्काच्या सुट्टीवर गदा शिक्षकांना नको असते. म्हणून शालेय कामकाजाच्या दिवसात अशी अधिवेशने आयोजित केली जातात.
जिल्ह्यातील १ हजार ६७0 शाळांना कुलूप
By admin | Updated: February 6, 2016 01:43 IST