कोल्हापूर : दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम उरकून घरी जाणाऱ्या चौघा शाळकरी मुलांना तिघा लुटारूंनी मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून लुटले. त्यांच्याकडून चार मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेत ते पसार झाले. शनिवारी भरदिवसा साडेअकराच्या सुमारास मेरी वेदर मैदानावरील फुटपाथवर ही घटना घडली. भयभीत झालेल्या मुलांनी घरी जाऊन पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी मुलांनी लुटारूंचे सांगितलेले वर्णन आणि सीसीटीव्ही फुटेजवरून तिघा लुटारूंना अवघ्या पाच तासांत अटक केली. संशयित रोहित राजू जाधव (रा. न्यू शाहूपुरी), पवन वसंत पुजारी (रा. विचारे माळ), श्रेयस सुगंधकुमार दिलपाक (रा. कावळा नाका) अशी त्यांची नावे आहेत. चैनीसाठी लूटमार केल्याची त्यांनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, अभिषेक अजित वाळवेकर (वय १६), श्रावण यशवंत शेट्टी (१६), प्रथमेश संजय सुर्वे (१६), प्रणव शैलेंद्र गाडेकर (१६, सर्व रा. रमण मळा, कसबा बावडा) हे चौघे सेंट झेवियर्स स्कूलमध्ये दहावीमध्ये शिकतात. शनिवारी त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर हे चौघे चालत घरी निघाले होते. मेरी वेदर मैदानासमोरील फुटपाथवरून जात असताना पाठीमागून मोटारसायकलवरून तिघे तरुण आले. त्यांनी या चौघांना अडवून थेट मारहाण केली. अचानक घडलेल्या प्रकाराने चौघेही बिथरून गेले. तिघांपैकी एका तरुणाने चाकू दाखविताच भीतीने तिघेही थरथरले. यावेळी चौघांच्या खिशातील मोबाईल व पैसे काढून त्यांनी पलायन केले. या रस्त्यावरून वाहनधारकांची ये-जा सुरू होती. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. मारहाण होत असताना या मुलांची विचारपूस करण्याचे धाडस कोणीही केले नाही. चौघाही मुलांचे अंग भीतीने घामाघूम झाले होते. त्यांनी तेथून थेट घर गाठले. त्यानंतर चौघांचेही पालक शाहूपुरी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांची भेट घेऊन माहिती दिली. भरदिवसा या रस्त्यावर लूटमार झाल्याने पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी) लूटमारीचा प्लॅनरोहित जाधव हा दहावी नापास आहे. पवन पुजारी व श्रेयस दिलपाक हे कदमवाडी येथील भारती विद्यापीठमध्ये दहावीमध्ये शिकतात. तिघेही मित्र आहेत. पुजारीच्या वडिलांची मोटारसायकल आहे. त्यावरून हे तिघेजण फिरत असत. रोहित जाधव याला पैशाची गरज होती. त्यामुळे या तिघांनी शाळेच्या मुलांना लुटण्याचा प्लॅन आखला. मोबाईल काढून ते विक्री करून त्यातून पैसे मिळवणार होते. चैनीसाठीच त्यांनी लूटमार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
भरदिवसा दहावीच्या चौघा मुलांना मारहाण करून लुटले
By admin | Updated: February 5, 2017 00:47 IST