लोकमत न्यूज नेटवर्कराजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खडकी परिसरातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याअभावी पिके जळून चालली आहेत. खडकवासला कॅनॉलअंतर्गत वितरिका क्रमांक ३२, ३४, ३५ मध्ये पाणी सोडण्याची मागणी पंचायत समिती सदस्य प्रकाश नवले आणि सरपंच मंगेश शितोळे यांनी केली आहे.पूर्व भागातील खडकी, रावणगाव, नंदादेवी आणि स्वामी चिंचोली हा परिसर खडकवासला कॅनॉलअंतर्गत वितरिका क्रमांक ३२, ३४, ३५ च्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु या परिसरातील खडकवासला कॅनॉलचे उन्हाळी आवर्तन लांबल्याने या भागाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावांमध्ये पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, कूपनलिका आदी जलस्रोत कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी उभी पिके जळून चालली आहेत. या परिसरातील ऊस, भुईमूग, फळबागा, जनावरांसाठी हिरवा चारा, तरकारी आदी पिके जळून गेली असून बळीराजाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे या परिसरातील शेतकरी खडकवासला कॅनॉलअंतर्गत वितरिका क्रमांक ३२, ३४, ३५ वर येणाऱ्या ओढे व बंधारे यामध्ये तत्काळ पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत.
पिके जगवण्यासाठी आवर्तन सोडा
By admin | Updated: May 9, 2017 03:31 IST