नारायणगाव : जुन्नर तालुक्यात बिबट्याचा उपद्रव सुरूच असून कांदळी गावात बिबट्याने एका शेळीला ठार केले. वनविभागाने मृत शेळीचा पंचनामा केला. मात्र, जुन्नर तालुक्यात ऊसतोडणी होईल, तसे बिबट्याचे उपद्रव वाढणार आहे.कांदळी येथील शेतकरी सचिन मुरलीधर गुंजाळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीनवर्षीय शेळीवर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला करून ठार केले. घरातील लोकांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्याने पलायन केले. वनविभागाने मृत शेळीचा पंचनामा करून १६ हजार रुपये नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याचा वावर परिसरात असल्याने स्थानिक लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी, तसेच सचिन गुंजाळ यांनी केली आहे. नारायणगाव वनविभागाच्या हद्दीत बिबट्याची संख्या लक्षणीय आहे, ऊसतोडणी सुरू झाल्यानंतर बिबटे उसातून बाहेर पडतात आणि मनुष्यवस्तीचा आसरा घेतात आणि रात्री भक्ष्य शोधताना मनुष्यवस्तीत येतात, बिबट्याच्या वावरामुळे परिसरात घबराट पसरली आहे. (वार्ताहर)
कांदळीत बिबट्याने केली शेळी ठार
By admin | Updated: December 26, 2016 02:43 IST