दावडी : खरपुडी (ता. खेड) येथील बंधाऱ्याचे ढापे पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्री फोडल्यामुळे लाखो लिटर पाणी या बंधाऱ्यातून वाहून गेले आहे. बंधारा रिकामा झाला असून या परिसरात पिके जळण्याच्या मार्गावर आहे. खरपुडी येथील भीमा नदीवरील बंधारा या परिसराला वरदान ठरला आहे. या बंधाऱ्यात १.४२ दशलक्ष घनमीटर पाणी साचते. खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी येथील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होतो. या बंधाऱ्यातील पाणी जून महिन्यापर्यंत टिकते. दोन आठवड्यांपूर्वी भीमा नदीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी या बंधाऱ्याचे ढापे काढले होते. याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त छापले होते. याची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने या बंधाऱ्याचे काढलेले ढापे बसविण्यात आले होते. बुधवारी रात्री नदीकाठच्या व बंधाऱ्याखालील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आक्रमक होऊन पुन्हा एकदा या बंधाऱ्याचे दोन मोऱ्यांचे ढापे फोडले. या बंधाऱ्याचे चौकीदार अनंता होले यांनी बंधाऱ्याचे ढापे काढू नका, असे सांगितले. तसेच, बंधाऱ्याचे ढापे फोडण्यास होले यांनी मज्जाव केला असता आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी होले यांना दम देऊन पिटाळून लावले. दोन मोऱ्यांचे ढापे फोडल्यामुळे बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. बंधारा रिकामा झाला असून येथील शेतकरी हैराण झाला आहे. बंधाऱ्यात पाणीच नसल्यामुळे पिके जळून जाणार आहे. (वार्ताहर)
खरपुडी बंधारा फोडला
By admin | Updated: May 6, 2016 05:44 IST