जेजुरी खळद येथे गावचे कऱ्हा नदीच्या महापुरापासून संरक्षण व्हावे व गावाला होणारा संभाव्य धोका टाळावा यासाठी या भागांमध्ये संरक्षण भिंत व्हावी यासाठीचे निवेदन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने देण्यात आले.
सासवड येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी हे निवेदन देण्यात आले. या वेळी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब कामथे, सदस्य शारदा कामथे, नम्रता कादबाने, योगेश कामथे, आरती आबनावे, ग्रामस्थ विकास कादबाने, भैरू कामथे, सीमा कुंभार उपस्थित होते.
गेले काही वर्षे कऱ्हा नदीला येणाऱ्या महापुरामुळे नदीच्या पात्राचा विस्तार होऊन पात्र गावच्या बाजूला येऊ लागले आहे. तर दीड वर्षापूर्वी आलेल्या मोठ्या महापुरात नदीचे पाणी संपूर्ण गावांमध्ये शिरले होते. यावेळी गावातील नागरिक गाव सोडून बाहेर आश्रयाला आले होते. यामुळे पावसाळ्यामध्ये कधी महापूर येऊन गावात पाणी आले तर मोठ्या प्रमाणावरती गावठाण वाहून जाऊ शकते. यामुळे नागरिकांच्या मनात मोठे भीतीचे वातावरण असून या भागात तातडीने संरक्षक भिंत व्हावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने वारंवार केली जात आहे.
खळद गावाला संरक्षक भिंत व्हावी याबाबत निवेदन खा. सुप्रिया सुळे यांना देताना.