पुणे : काही गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. राज्यात एकी निर्माण करणे, जबाबदारी सर्वांची आहे. हा विचार शेवटच्या माणसापर्यंत जाईल तेव्हा एकी निर्माण होईल. राजकीय विचार वेगळे असतील; पण महाराष्ट्र शांत झाला पाहिजे. हे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नसून, ती जबाबदारी सर्वांची आहे. त्याकरिता साहित्यिकांची लेखणी उपयुक्त ठरेल, असे मत ज्येष्ठ नेते, दिल्ली येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.
निमित्त हाेते, सरहद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयाेजित साहित्यिकांशी संवाद कार्यक्रमाचे. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ‘मसाप’चे अध्यक्ष आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, राज्यात एकी निर्माण झाली पाहिजे. परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे. यासाठी इथे येण्यापूर्वी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाने मराठी भाषेचा गौरव होणार आहे. दिल्लीतील लोकांना मराठी साहित्य संमेलनाची उत्सुकता आहे. या संमेलनाबद्दल सर्वांना औत्सुक्य आहे, असेही पवार यांनी नमूद केले.