पुणे : राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्मातील संथारा (सल्लेखना) व्रत व परंपरा ही आत्महत्या असल्याचा निर्णय दिला आहे. परंतु, संथारा व्रत ही आत्महत्या नसून पवित्र व्रत व परंपरा आहे. त्यामुळे केंद्र शासनाने वरिष्ठ वकिलामार्फत आणि जैन समाजातील संतांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील करावे. तसेच, हजारो वर्षांपासून चालत आलेल्या संथारा व्रताची परंपरा कायम व अबाधित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने अध्यादेश काढून या व्रताला घटनात्मक अधिकार देण्यात यावा. त्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यातील सकल जैन समाजातर्फे शनिवारी देण्यात आली. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाने जैन धर्मीय व समाजातून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (दि. २४) देशभर मूकमोर्चा काढून नाराजी व्यक्त करण्यात येणार आहे. पुण्यातील सकल जैन समाजातर्फे ओसवाल बंधू समाज चौक येथून विधानभवनापर्यंत सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे जैन समाजासह सर्व धर्मांतील नागरिकांनी आपले धार्मिक घटनात्मक अधिकार अबाधित राखण्यासाठी मूकमोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जैन समाजातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध उद्योजक फत्तेचंद रांका, विजयकांत कोठारी, अचल जैन, पोपट ओस्तवाल, मिलिंद फडे, डॉ. कल्याण गंगवाल, महावीर कटारिया, अॅड. अभय छाजेड, प्रवीण चोरबेले, लक्ष्मीकांत खाबिया, चंदूभाई शहा, अमिचंद संघवी, अशोक हिंगड, महेंद्र जैन व विपुल शहा आदी उपस्थित होते. जैन धर्मामध्ये संथारा ही आत्महत्या नाही. संथारा ही उच्च परंपरा व पवित्र व्रत मानले जाते. ही जैन धर्मातील साधना असून, शरीराच्या त्यागाचा उत्सव आहे. (वार्ताहर)
संथाराचा अधिकार अबाधित ठेवा
By admin | Updated: August 23, 2015 04:44 IST