कुरकुंभ : जिरेगाव, कौठडी (ता. दौंड) येथे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. टँकरची एक खेपदेखील गेले दोन दिवसांपासून बंद झाल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे.दौंड तालुक्यातील दुष्काळीपट्टा म्हणून ओळखला जाणारा जिरेगाव, कौठडी हा भाग सध्या उभ्या ठाकलेल्या पाणी टंचाईचा सामना करीत आहे. त्यात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अडचणीत भरच पडली आहे.जिरेगाव, कौठडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर सुरू होता. दिवसांत होणाऱ्या फक्त एका खेपेवर आपली तहान भागवत होता. वरवंड येथील तलावातून पाण्याचे टँकर भरून या गावास कसेबसे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, गेले दोन दिवसांपासून या टँकरवर पाणी भरण्यास बंद झाल्यामुळे या गावांवर पाण्याचे संकट ओढावले आहे.या ठिकाणच्या ग्रामस्थांनी तहसीलदार यांची भेट घेऊन वरील प्रकार सांगितले. त्याप्रमाणे कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रामधील पाणीपुरवठा करणाऱ्या विभागातून पाणी घेण्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात येथील संबंधित अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाशिवाय पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनिक प्रक्रियेत पाणीपुरवठा अडकला असल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळते. (वार्ताहर)
दौंडमधील कौठडी, जिरेगावचे पाणी बंद
By admin | Updated: April 7, 2016 00:48 IST