चासकमान : चासकमान धरण प्रकल्पाची निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्षातील सिंचित क्षेत्र यामध्ये धरणातील गाळामुळे थोडासा फरक पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे १९९४ पासून वाहत आलेल्या गाळामुळे धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात ४ टक्क्यांनी घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.चासकमान धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २४१.६९ द.ल.घ.मीटर म्हणजेच ८.५२३ टीएमसी आहे. या धरणामुळे खेड तालुक्यातील ८ हजार २८३ हेक्टर व शिरूर तालुक्यातील २६ हजार ५११ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. धरणात जून १९९४ पासून पाणी साठविण्यास सुरुवात झाली. १९९४ ते २०१६ म्हणजेच गेली २१ वर्षांत चासकमान धरणात ४ टक्के गाळ वाहून आणला आहे. चाळीस वर्षांनंतरच साठलेल्या गाळाचे मोजमाप केले जाते. पाणीसाठा कमी झाला असलातरी सिंचन क्षेत्रावर परिणाम झालेला नाही.कुकडी प्रकल्पात अंदाजे ६.५० टक्के गाळघोडेगाव : आंबेगाव, जुन्नर तालुक्यात राबविण्यात आलेल्या कुकडी प्रकल्पात पाच धरणे बांधण्यात आली आहे. या धरणांमध्ये ३३.३८ टीएमसी पाणी जमा होते; मात्र मागील काही वर्षांत जमिनीची धूप वाढल्यामुळे, या धरणांमुळे मोठ्या प्रमाणात गाळ साठू लागला असून, अंदाजे ६.५० टक्के गाळ जमा झाला आहे. कुकडी प्रकल्प १९७८ मधे सुरू झाला व यातील पाच धरणांची कामे २००२ पर्यंत पूर्ण झाली. डिंभे धरणात १३.५० टीएमसी, माणिकडोह १२.५०, वडज १.००, येडगाव २.३८, पिंपळगाव जोगा ४.५० पाणीसाठा बसतो. या धरणातील पाण्यामुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर बरोबरच नगर जिल्ह्यातील शेती सुजलाम् सुफलाम् झाला आहे. मात्र, दिवसेंदिवस जमिनीची होत असलेली धूप, डोंगरावरील वृक्षतोड यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात माती वाहून येते. ही माती धरणांमध्ये साठत असल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी होत चालली आहे. कुकडीमधील माणिकडोहसारख्या धरणात सर्वांत जास्त गाळ साठला आहे. तसेच वडज, येडगाव ही छोटी धरणे पुढील काही वर्षांत गाळाने भरून जातील, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. धरणांमध्ये साठत असलेल्या गाळाचे सर्वेक्षण मेरी इंजिनिअरिंग, नाशिक ही संस्था करते. प्रकल्पात साठत असलेल्या गाळाचे सर्वेक्षण दर १० वर्षांनी होते. यापूर्वी सर्वेक्षणाप्रमाणे दर दहा वर्षांत एकूण टीएमसीच्या २ टक्के गाळ जमा होत आहे. हे प्रमाण पाहता पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गाळ धरणांमध्ये जमा होणार आहे. कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नुर यांच्याशी संपर्क साधला असता, धरणातील गाळांचे सर्वेक्षण मेरी इंजिनिअरिंग नाशिकमार्फत केले जाते. या संस्थेने अहवाल दिल्यानंतर कमी झालेला पाणीसाठा रेकॉर्डवर घेऊन तेवढा साठा एकूण साठ्यातून कमी केला जातो. तसेच गाळ काढण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा तुलनात्मक अभ्यास करून गाळ काढण्याचे नियोजन महामंडळामार्फत केले जाते. तसेच धरणातील माती शेती, विटभट्टीसाठी उचलण्यास या खात्याकडून परवानगी दिली जाते.
धरणांच्या पाणीसाठ्यावर ‘गाळा’चा घाला
By admin | Updated: February 3, 2016 01:17 IST