निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यामध्ये सध्या पाणीटचाई भेडसावत असतानाच अचानक होणाऱ्या हवामानातील बदलामुळे टोमॅटोच्या पिकावर करपा रोगासह इतर रोगांचाही प्रादुर्भाव होताना दिसत आहे. या भयानक अवस्थेत बाजारभावही समाधानकारक मिळत नसल्याने या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये डाळिंबपिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणवर वाढले आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची, कांदा, ऊस, ज्वारी मका यासारखी पिके घेतली जातात. यामध्ये टोमॅटोपिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, कमी कालावधीमध्ये समाधानकारक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे शेतकरी पाहतात. या भागातील शेतकऱ्यांनी यापूर्वी टोमॅटोपिकापासून लाखो रुपयाचे उत्पन्न मिळविल्याची उदाहरणे या भागात पाहायला मिळतात; परंतु सद्य:स्थितीमध्ये टोमॅटोशेती धोक्यात आल्याचे चित्रा दिसत आहे.निमगाव केतकी (ता. इंदापूर) परिसरात अनेक शेतकरी टोमॅटोची शेती करतात. या पिकाची लागवड करताना शेतीची मशागत करणे, शेतीमध्ये खत टाकणे, बेड सोडणे, मल्चिंग पेपर बसविणे, ठिबक सिंचन करणे, रोपांची लागवड करणे, विविध औषधांची फवारणी व विविध खतांचा ठिबकमधून दिला जाणारा डोस यांसाठी एकरी जवळपास ६० ते ७० हजारांपर्यंत खर्च करावा लागतो. मात्र, या पिकाला योग्य बाजारभाव मिळाला नाही, तर शेतकरी कर्जबाजारी होतो. बाजारभाव पडलेल्या काळात अनेकदा शेतकऱ्यांना विक्रीयोग्य झालेले टोमॅटो बांधावर टाकून द्यावे लागतात. यामुळे पिकासाठी केलेला खर्चही निघत नाही. आजही टोमॅटोपिकाला समाधानकारक बाजार मिळत नसल्याचे चित्र आहे. पिकाच्या उत्पादनखर्चाच्या तुलनेत बाजार मिळत नाही; त्यामुळे या भागातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आडचणीत आल्याचे दिसत आहे.
टोमॅटोवर करप्याचा प्रादुर्भाव
By admin | Updated: January 20, 2016 01:20 IST