पुणे : छत्रपती शिवाजीमहाराजांनी आयुष्यभर राष्ट्रकारण केले. आज त्यांचेच नाव घेणारे राष्ट्रवादात दंग झालेले दिसत आहेत. आज राजांची शिकवण तर सोडाच; परंतु राष्ट्रवादापुढे राष्ट्रकारणालादेखील महत्त्व न देणारे राजकारणी सभोवताली दिसतात, याची खंत वाटते, असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले. श्री आदिशक्ती फाउंडेशनतर्फे आऊसाहेब पुरस्काराचे ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यंदा आऊसाहेब पुरस्काराने शांताबाई नवलखा, लक्ष्मीबाई साळुंके, विमल बऱ्हाटे, जनाबाई आसबे, शांता वाके आणि ताराबाई कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. शिवदास निनाद पुरस्काराने यंदा मुंबईतील दादर येथील अप्पासाहेब परब यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, ज्योतिषशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.परांजपे म्हणाले, ‘‘आदिशक्ती या शब्दात मोठा इतिहास दडलेला आहे. तो लिखित स्वरूपात नाही. भारतीयांची सर्जनशील शक्ती म्हणजे आदिशक्ती होय. इ.स.पूर्व १३ हजार वर्षांहून अधिक पूर्वी मातीचा कलश, घट निर्माण केला गेला. त्याच्यामागचे मूळ चिंतन म्हणजे कोणत्याही पोकळीला आकार दिला, की घट अर्थात अवकाश तयार होते. महाराजांनी असेच राष्ट्रअवकाश घडविले. महाराष्ट्राच्या भूमीला सुपीक आणि सर्जनशील बनवले. महाराजांनी सर्जनशीलता, रसिकता आणि सभ्यता हे त्या अवकाशाची खांब असल्याचे वेळीच जाणले होते. या खांबाची खरी बेरीज म्हणजे खरा धर्म होय. अशा धर्माला प्रचार-प्रसाराची आवश्यकता नसते. या वेळी पुरस्कार्थींच्या वतीने त्यांच्या परिवारातील सदस्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. अप्पासाहेब परब यांच्या मनोगताने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. प्रशांत जगताप यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे राजमिथुन अंबिराज, सूर्यकांत कडू, निनाद नाईक, अभिषेक तिवारी, प्रथमेश केसकर, वैभव जोशी, सत्यम शुक्ला, प्रकाश झा आदी सभासदांनी विशेष प्रयत्न केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. तेजस लडकत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
राष्ट्रकारणाचे वाढते महत्त्व धोक्याचे
By admin | Updated: January 24, 2017 02:20 IST