पॅनलप्रमुख सर्वच्या सर्व जागा निवडून द्या म्हणतो. तर उमेदवार मात्र मला एकच मतदान करा, म्हणून विनंती करीत आहेत. काही उमेदवार तर चक्क महाराजांकडे बाड बघून मी निवडून येईल की नाही, असे भविष्य पाहत आहेत. रात्रीला चक्क ओल्या पार्ट्या करत आहेत आतापासूनच खर्च सुरू झाल्याने तळीरामांना सुगीचे दिवस आले. सोशल मीडियावर आपल्या नावाचे बॅनर व व्हिडीओ काढून प्रचार करीत आहेत. पॅनलप्रमुखही वार्डातील प्रत्येक घरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. आपले नातेवाईक, मित्रमंडळी कामानिमित्त मुंबई-पुण्याला गेलेल्यांना मतदान करण्यासाठी या व तुम्हाला येण्या-जाण्याचा खर्च देतो, अशी विनंती करीत आहेत. अशा हालचालींना ग्रामीण भागात वेग आला असून, मला फक्त एकच मतदान करा, बाकी तुमच्या मनानं करा, असा जोर सध्या गावागावात पाहावयास मिळत आहे, गावातील मतदार कामानिमित्त बाहेर शहरात कुठे कुठे राहतात याचा शोध मतदार यादी बघून उमेदवार व पॅनल प्रमुख शोध घेऊन फोनवर संपर्क साधून मी उभा आहे मला मतदान करा. मी तुमची येण्या-जाण्याची व्यवस्था करतो, असे म्हणताना उमेदवार दिसून येत आहेत. तर, रात्रीला धाबे आखाडे कार्यकर्त्यांनी गजबजून गेले असून ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शेतीकाम करण्यास मजूर मिळत नसल्याने शेतकरी व्यस्त झाले आहेत.
हात जोडतो-पाया पडतो, मात्र एक शिक्का मला मारा..! रिंगणातील उमेदवाराची विनवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST