पिंपरी : हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञाननगरीतील वाहतूककोंडीसंदर्भात मागील महिन्यात ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. याचा संदर्भ देत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधिमंडळात वाहतूक प्रश्नाबाबत लक्षवेधी मांडली. त्यानुसार हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सभागृहाने दिले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि हिंजवडी ते म्हाळुंगे या रस्त्याच्या कामाला गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे वर्षानुवर्षे होणाऱ्याा वाहतूककोंडीच्या त्रासापासून अभियंत्यांना सुस्कारा मिळणार आहे.हिंजवडी, माण, मारुंजी परिसरात माहिती तंत्रज्ञाननगरी विकसित झाली आहे. आयटी पार्कमधील टप्पा तीनमधील मेक इंन इंडिया या उप़क़्रमांतर्गत झालेल्या एका प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट यांनी वाहतूक प्रश्नाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नियोजनाच्या अभावाने या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा अनुभवही सांगितला होता. या संदर्भात ‘लोकमत’ने मागील महिन्यात सलग आठवडाभर वृत्तमालिका प्रकाशित केली. ‘पाच महिन्यांसाठी लागतो तास, अग्निशामक विभागाचा कारभार एका चालकावर, अधिकारी आणि माफियांमुळे भूसपांदनास खोडा, सदोष भूसपांदन कारवाईमुळे विकास रखडला,’ असे विविध विषय मांडले होते. विकास आराखड्यानुसार रखडलेले रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला चुकीचा पूल, वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना, रखडलेला टप्पा दोन ते म्हाळुंगे बालेवाडी रस्ता अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला होता. विकासात होणारे राजकारण आणि ढिम्म प्रशासनामुळे आयटी पार्कचा विकास कसा रखडला आहे, यावर लक्ष वेधले होते. तसेच या भागातील शेतकरी, उद्योजकांनी आणि आयटी पार्कमधील कामगारांनी नाराजी व्यक्त केली होती. जगताप यांनी लक्षवेधीही मांडली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
हिंजवडीची फुटणार कोंडी
By admin | Updated: December 24, 2015 00:46 IST