पुणे : ‘‘दुसऱ्यांनी आपल्याशी चांगले वागावे, अशी अपेक्षा ठेवताना आपणही त्यांच्याशी चांगले वागणे हा धर्म आहे, आम्ही हिंदू आहोत, असे सांगण्याचा संकोच केला जात आहे. मात्र हिंदू धर्माने जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे, हे ध्यान्यात घेतले पाहिजे,’’ असे मत वेदविज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. प. वि. वर्तक यांनी व्यक्त केले.डॉ. प. वि. वर्तक सहस्रचंद्रदर्शन समारोह समितीतर्फे करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते वर्तक यांचा सहस्रचंद्रदर्शनानिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमस प. पू. दादाजी वैशंपायन, ज्येष्ठ विधीज्ञ दादासाहेब बेंद्रे, ‘गप्पाष्टककार ’ संजय उपाध्ये, समितीचे अजय डोंगरे आणि भालचंद्र बोकील उपस्थित होते.शंकराचार्य म्हणाले, की तप करूनही केवळ क्रोधामुळे विश्र्वामित्राला ब्रह्मर्षी ही उपाधी मिळू शकली नाही. अभ्यास आणि संशोधनाबरोबरच संयम या गुणांमुळे डॉ. वर्तक ब्रह्मर्षी झाले आहेत. हिंदू धर्म हा परिपूर्ण असून, आपले १६ संस्कार हे वेदांचे परिपूर्णत्व दाखविणारे आहेत.त्यामुळे धर्माची कास धरून परंपरांचे जतन करूनच आचरण केले पाहिजे. बेंद्रे म्हणाले, की विविध विषयाचा सखोल अभ्यास हा वर्तक यांचा स्थायी भाव आहे. अजय डोंगरे यांनी प्रास्ताविक ,यशश्री पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले.
हिंदू धर्माने जग कल्याणाचा विचार केला : वर्तक
By admin | Updated: May 24, 2015 00:36 IST