इंदापूर: ऊसतोड मजूर हा स्थलांतरित होणारा मजूर असून त्याच्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. ऊसतोड मजूर हा गोरगरीब कुटुंबातील आहे. त्याच्या हाताला काम नसताना जर तो आजारी पडला तर त्याने उपचार कुठे करायचे, हा त्याच्यापुढे पडलेला मोठा प्रश्न असतो. मात्र अशा परिस्थितीत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले हे देशासाठी एक मॉडेल प्रोजेक्ट आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व नवीन वर्षानिमित्त कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यातील ऊसतोड कामगारांसाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र रविवारी (दि.३) सुरू करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, भागवत गटकूळ, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, कर्मयोगीचे संचालक अतुल व्यवहारे, प्रशांत सूर्यवंशी, राजेंद्र चोरमले, माया विंचू, अशोक इजगुडे, अरविंद वाघ आदी उपस्थित होते.
या प्राथमिक आरोग्य केंद्रातून नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना चालू गाळप हंगामात ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांसाठी विनाशुल्क सेवा दिली जाणार आहे. ऊसतोड मजुरांना व कामगार यांना प्राथमिक उपचार सर्दी, खोकला, ताप, चक्कर, उलटी, थंडी, जखम, ड्रेसिंग, बीपी तपासणी विविध तपासण्या करण्याची सेवा डॉ. वर्षा बोराडे, डॉ. भाग्यश्री चव्हाण, डॉ. अनुजा कुदळे या देणार आहेत. स्वराज्य ग्रुप विकास प्रतिष्ठानच्या वतीने कर्मयोगी कारखान्याचे संचालक अतुल व्यवहारे यांनी सदर प्राथमिक आरोग्य केंद्रास मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याचे जाहीर केले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव तुषार रंजनकर यांनी केले. आभार किरण खंडागळे यांनी मानले.
————————————————————
प्राथमिक आरोग्याचे केंद्राचे उदघाटन करताना हर्षवर्धन पाटील व इतर.
०७०१२०२१-बारामती-१८