पुणे : शहरामध्ये ठिकठिकाणी साठलेला कचरा पावसामुळे भिजू लागल्याने तो सडण्यास सुरुवात झाली आहे. कचऱ्याचा चिखल तयार होऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट पूर्ण क्षमतेने कशी लावायची हा बिकट प्रश्न पालिकेला सोडवावा लागणार आहे. उरुळी देवाची व फुरसुंगी येथील डेपोमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून कचरा टाकण्याची अट ग्रामस्थांनी टाकली आहे. कचरा भिजू लागल्याने अडचणी निर्माण होत आहेत. शहरामध्ये दररोज तेराशे ते चौदाशे टन कचरा तयार होतो, त्यापैकी पाचशे टन कचरा डेपोमध्ये टाकला जात आहे. साडेतीनशे ते चारशे टन कचरा शेतकरी खतासाठी घेत होते. तसेच उर्वरित कचरा बायोगॅस व इतर प्रकल्पांसाठी पाठविला जातो. पावसामुळे शेतकऱ्यांकडून कचरा घेतला जाणे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या कचऱ्याचा जटिल प्रश्न पुन्हा उभा राहणार आहे. शहरातील मध्यवस्तीसह उपनगरांमधील अनेक ठिकाणी कचरा उचलला गेला होता, त्यातच रविवारपासून पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने कचरा भिजून सगळीकडे पसरू लागला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात कचरा साठल्याने अचानक चिलटांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. पावसामुळे कचरा सडल्यास त्यातून आरोग्याचे आणखी गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पावसात कचरा भिजू लागल्याने आरोग्याचा प्रश्न
By admin | Updated: June 22, 2015 04:34 IST