लोकमत न्यून नेटवर्क
पुणे : गावकारभाऱ्यांच्या निवडणुकांसाठी गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा उद्या बुधवारी सांयकाळी ५ वाजता थंडावणार आहेत. शुक्रवारी मतदान होणार असून मतदानाची सर्व तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आज गावा गावातून संचलन करत निवडणुक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यात ६५० ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ लारखेला हाेणार आहे. या निवडणुकीत २ हजार ३१ प्रभागासाठी जवळपास ११ हजार ७ उमेदवार रिंगणार आहेत. ४ जानेवारी रोजी ८१ ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध झाल्याने ७४६ पैकी ६५० ग्रामपंचयातीसाठी निवडणुका लागल्या होत्या. ४ तारखेनंतर प्रत्यक्ष प्रचाराला उमेदवारांनी सुरूवात केली. उमेदवारांना प्रचारासाठी केवळ ९ दिवस मिळाले. या निवडणुकीत अनेक भावकी एकमेकांच्या विरोधात निवडणुक रिंगणात उभे आहेत. प्रत्येक उमेदवाराने मतदारा पर्यंत पोहचण्यासाठी या दिवसांत जिवाचे राण केले.
उमेदवाराच्या प्रत्यक्ष घरी जाऊन, रॅली, सभा, कोपरा सभा, जाहिर सभा घेत मतदाराला साद घालण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. गावाबाहेर असलेल्या मतदारांनाही प्रत्यक्ष संपर्क मतदानाच्या दिवशी गावात येत गावाच्या विकासाठी मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले. एरवी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान दिसणारा हायटेक प्रचार यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळाला. उमेदवारांनी फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉट्अॅप सोबतच ट्टीटरचाही वापर प्रचारासाठी केला. गावातील अनेक ग्रुपच्या माध्यमातून प्रचार करत आपली केलेली विकास कामे तर गावाच्या विकासाचा मास्टर प्लॅन दाखवत निवडणुकीत आपल्यालाच मतदान करण्यासाठी साद घातली.
उमेदवारांनी प्रचारात जिवाचे रान केले असले तरी त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा मतदार राजावर काय परिणाम होतो हे १८ तारखेला मतमोजणीच्या दिवशीच कळणार आहे.