लोकमत न्यूज नेटवर्कवडापुरी : सध्या दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यातील असलेल्या सर्वच विहिरींनी तळ गाठले आहेत. पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत. त्यामुळे सध्या जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्याने गंजी लावलेल्या कडब्यालाच चढ्या भावाने खरेदी करताना तालुक्यातील शेतकरी दिसत आहेत.गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले होते. कडबा चांगल्या प्रमाणात निघाल्यामुळे चारा उपलब्ध झाला होता. तसेच मकापिकसुद्धा चांगल्या प्रमाणात लावल्यामुळे मकवनसुद्धा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध झाले होते. शेतकऱ्यांनी चारा उपलब्ध असावा, म्हणून मोठ्या प्रमाणात कडबा मकवन खरेदी केले होते. परंतु ते संपत आल्याने उन्हाळ्यात आणखी खरेदी करण्यासाठी शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांकडे फिरत आहेत. परंतु उन्हाळ्यात विहिरींनी तळ गाठल्यामुळे हिरवा चारा उपलब्ध नसल्याने गंजी लावलेल्या कडब्याला व रानात असलेल्या मकवनाला चढा दर मिळत आहे. सध्या कडक दुष्काळात जनावरांना जगविणे मोठ्या जिकीरीचे झाले आहे. चाऱ्याला उन्हाळ्यात सोन्याचे दिवस आल्याचे ग्रामीण भागामध्ये पाहावयास मिळत आहे.
गंजी लावलेल्या कडब्याला चढा दर
By admin | Updated: May 9, 2017 03:30 IST