चाकण/म्हाळुंगे : तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग हा वाहतूककोंडी आणि यमलोक मार्ग बनला आहे. गेल्या पाच वर्षांत या मार्गावर घडलेल्या साडेचारशे अपघातांमधील अडीचशे जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर चारशे जण जखमी झाले. यामधील काही जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. चाकण तळेगाव महामार्ग कृती समितीने माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे चक्के कृती समितीने महामार्गावर यमलोक मार्गाचे फलक लावत महामार्ग प्रशासनाचा निषेध केला आहे.
तळेगाव - चाकण-शिक्रापूर या दरम्यानच्या मार्ग आैद्योगिक वसाहती असल्याने अवजड वाहनांची माेठी ये-जा या मार्गाने येत असते. यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी नेहमीच असते. मागील काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने टोलबंदी केल्यानंतर तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विशेष विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये वाढत्या रहदारीच्या तुलनेत ५६ किलोमीटर अंतराच्या या मार्गाची दुरुस्ती आणि देखभालीकडे कायमच दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तीन वर्षांपूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी म्हणून घोषित करण्यात आला. परंतु तो अद्यापही कागदावरच राहिला आहे. नुकतेच जाहीर करण्यात आलेले ३०० कोटी रुपयांचे बारा मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम होण्यास अजून किती दिवस लागणार? याबाबत अनिश्चितता आजही कायम आहे. गेल्या पाच वर्षांत या रस्त्यावर झालेल्या अपघाताची आकडेवारी मनात धडकी भरवणारी आहे.
सर्वाधिक अपघात सन २०१७ मध्ये घडल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे समोर आलेल्या आकडेवारीवरून वर्षाला ४० तर महिन्याला सरासरी ४ जणांना नादुरूस्त रस्त्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, या ना दुरूस्त रस्त्याबाबत कुठलाच लोकप्रतिनिधी काहीच बोलत नाही. सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांमध्ये या रस्त्याच्या कामावरून सतत टोलवाटोलवी केली जात आहे. कुणीही रस्त्याच्या दुरुस्ती व वाहतूककोंडी कमी करण्याची जबाबदारी घेत नाही. केवळ तात्पुरत्या किरकोळ दुरुस्त्या करण्याची कामे केली जात आहेत.
तळेगाव ते चाकण या दरम्यानच्या या अरुंद रस्त्याच्या साइडपट्ट्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून दररोज काही हजारांच्या संख्येत लहान मोठी वाहने ये-जा करत असतात त्याच पटीत कामगार आणि वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात अनेकदा निवेदने विनंत्या करण्यात आल्या. मात्र याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. रोजची वाहतूककोंडी आणि अपघातामुळे शिरूर, मावळ व खेड तालुक्यातील पन्नास ते साठ टक्के नागरिकांसह हजारो कामगारांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याची दखल घेत नाही.
चौकट
"यमलोक महामार्ग" सावधान ... पुढे धोका आहे...!
तळेगांव-चाकण महामार्ग अशा प्रकारचे होर्डिंग फ्लेक्स चाकण तळेगाव रस्त्यावर जागोजागी लावुन कृती समितीच्या वतीने सर्व नागरिकांना व वाहनचालकांना आवाहन करण्यात आले आहे. सावधान सावधान ! सावधान ! सावधान ! तळेगाव -चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरील प्रचंड अवजड वाहतूक असते, नागमोडी वळणे आहेत तसेच रस्त्याला कमी रुंदी आहे आणि अपघातप्रवण ठिकाणे यामुळे हा महामार्ग धोकादायक झाला आहे, असे फलक या रस्त्याचे कित्येक वर्षांपासून लालफितीत अडकलेले काम सुरू करण्याची मागणी कृती समितीनी केली आहे.
चौकट
तळेगांव-चाकण-शिक्रापुर राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या अपघातांची तसेच मृत्यूमुखी पडलेल्यांची माहिती कृतीसमितीकडून माहिती अधिकारा अंतर्गत मागवण्यात आली. २०१५ पासून ऑक्टोंबर २०२० पर्यंत
पुणे तळेगाव दाभाडे मार्गावर ५९ अपघात झाले. यात ४१ जण जखमी झाले तर २५ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले. तळेगाव एमआयडीसी दरम्यान एकूण ७० अपघात झाले. यात १४२ जण जखमी झाले तर ४० जणांचा मृत्त्यू झाला. चाकण- शिक्रापुर मार्गावर ३१८ अपघात झाले. यात २०७ जण जखमी तर १८५ जणांचा मृत्यू झाला. या सर्व अपघातांच्या आकडेवारीचे फलक या मार्गावर कृतीसमितीने लावली आहे व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कोट
शिक्रापुर तळेगाव महामार्गाने जवळपास २५० नागरिकांना यमलोकी धाडले आहे. यामुळे वाहनधारकांनो व पादचाऱ्यांनो स्वतःची काळजी घेत प्रवास करावा. कृती समितीने रस्ता दुरुस्ती बाबत प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत रस्ता दुरुस्ती झाली नाही तर येत्या फेब्रुवारी महिन्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
- नितीन गाड, अध्यक्ष कृती समिती
फोटो : कृती समितीच्या वतीने चाकण तळेगाव महामार्गावर लावण्यात आलेले होल्डिंग बोर्ड
* फोटो - चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका.