भानुदास पऱ्हाड / शेलपिंपळगावतीर्थक्षेत्र आळंदी शहरात वाढत्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना नाकावर रुमाल धरावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून, शहराबाहेरील वर्दळ बळावत चालली आहे. त्यामुळे शहरासाठी विविध उपाययोजना आखूनही वाढत्या समस्यांना आवर घालण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. अलंकापुरीला चारही बाजूंनी जोडणाऱ्या रस्त्यांच्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यांलगतच कचऱ्यांचे मोठमोठे ढीग तयार होऊ लागले आहे. परिणामी शहरात दुर्गंधीयुक्त वातावरण पसरत असून, स्थानिक नागरिकांना, भाविकांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानी पोहोचत आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून अलंकापुरीला वडगावमार्गे जोडणाऱ्या रस्त्याच्या चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीपासून साईडपट्ट्यालगत खोदण्यात आलेल्या साईडपट्ट्यांमध्ये साठला आहे. रस्त्यावरील सातशे ते आठशे मीटर अंतरावर आठ ते दहा ठिकाणी कचऱ्याचे ढीग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. नगर परिषदेकडून रस्त्यावरील कचरा मजुरांच्या साह्याने उचलला जात आहे. मात्र चरांमधील कचरा ‘जैसे थे’ अवस्थेत पडून राहात असल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, शिळे अन्न, शिळ्या पालेभाज्या, खरकटे अन्न अशा स्वरूपात हा कचरा असतो. त्यामुळे चार-पाच दिवसांत या कचऱ्याला उग्र वास सुटत आहे. परिणामी रस्त्यालगत असलेल्या स्थानिकांना तसेच वाटसरूंना दुर्गंंधीचा सामना करत मार्गक्रमण करावे लागत आहे. मुले शाळेत जाण्यासाठी स्कूलबसचा वापर करत असल्याने स्कूलबसची वाट पाहात बसलेल्या मुलांना दुर्गंधीयुक्त कचराकुंडी शेजारी उभे राहावे लागत आहे. मुलांना आजाराची लागण होत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. वाढत्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नगरपालिकेने तत्काळ उपाययोजना आखण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.(वार्ताहर)
अलंकापुरीत वाढतायेत कचऱ्याचे ढिगारे
By admin | Updated: April 29, 2017 03:51 IST