लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: महिनाभरापूर्वी 30 रुपये किलो असा भाव असलेली फ्लाॅवर आता एक रुपया किलो या दराने विकली जात आहे. या भावात शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने फ्लावर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
आंबेगाव तालुक्यात फ्लॉवर पिकाचे उत्पादन अनेक गावांमध्ये घेतले जाते. विशेषता पिंपळगाव, निरगुडसर, वडगाव काशिंबेग, लांडेवाडी, नारोडी, अवसरी, गावडेवाडी, काठापुर, महाळुंगे पडवळ, कळंब या गावातील शेतकरी फ्लॉवर पिक घेत असतो. यावर्षी मध्यंतरी पडलेल्या मुसळधार पावसाने लागवड केलेले शेतातील फ्लॉवर पिक नष्ट झाले. त्यामुळे फ्लावर पिकाचा तुटवडा भासुन बाजारभाव कडाडले. दहा किलोस 300 ते 350 रुपये असा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा या पिकाकडे वळाल्या. बटाटा बियाण्याचे बाजारभाव नऊ हजार रुपये क्विंटल असे विक्रमी झाले. कांदा रोपे पावसाने नष्ट झाली होती.त्यामुळे बटाटा व कांद्याची लागवड करणारा शेतकरी फ्लॉवरकडे वळाला. परिणामी लागवड क्षेत्र प्रमाणापेक्षा जास्त वाढले. पूर्वी घरी फ्लाॅवर रोपे तयार केली जात होती. आता रोपवाटिकेतून तयार रोपे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना लगेच फ्लॉवर पिकाची लागवड करता आली. सध्या मोठ्या प्रमाणावर फ्लॉवरचे उत्पादन निघत असून त्यामुळे बाजारभाव ढासळले आहेत. एक नंबर फ्लाॅवर ३० ते ४० रुपये तर दोन नंबर फ्लावर १० ते २० रुपये दहा किलो या भावाने विकली जाते. याचा अर्थ एक ते चार रुपये किलो अशा मातीमोल भावाने विक्री होत आहे.
चौकट
पिकांत सोडली जनावरे
एकरी तीस हजार रुपये खर्च या पिकासाठी येतो. 70 ते 80 पैसे या भावाने फ्लॉवरचे एक रोपे मिळते. त्यासाठी सुमारे पंधरा हजार रुपये खर्च येतो. औषधे, खते, मजुरी याचा खर्च वाढला आहे, अशी माहिती महेश मोरे यांनी दिली. सुदैवाने यावर्षी रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झाला आहे. पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला. तर औषध फवारणी करावी लागते. सध्या मिळत असलेल्या बाजारभावाने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही वसूल होत नाही. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत.
कोट
चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने फ्लाॅवर पिकाचे उत्पादन घेतले. मात्र सध्या भाव पूर्णपणे ढासळले आहेत. अगदी वाहतूक खर्चही वसूल होत नाही. शेतातील पीक तसेच सोडून देऊशी वाटत नाही. म्हणून फ्लाॅवर तोडून बाजारात नेली जाते. मात्र एक ते चार रुपये किलो या भावाने फ्लाॅवर विकली जात आहे.
- बबन हुले, उत्पादक