कामशेत : कडधे, ता. मावळ येथील शेतकरी दगडू हरीभाऊ भोकरे (वय ६८, रा. कडधे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी जमिनीमध्ये फसवणूक झाल्यामुळे व कसत असलेल्या जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी धमकावण्यात आल्याने राहत्या घरासमोरील शेतातील झाडाच्या फांदीला दोरी बांधूून शनिवारी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत त्यांचा मुलगा लहू दगडू भोकरे (वय २९, रा.कडधे ता.मावळ) यांनी तिघांविरोधात कामशेत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू भोकरे यांची कडधे येथे गट नं.१३३,१२८,१२४ या मिळकती वडिलोपार्जित असून, त्यांचाच ताबा आहे. भोकरे यांचे आजोबा हरीभाऊ वाघू भोकरे यांनी गट नं.११३,१२८,,१२४ हे तीन गट चंद्रकांत रघुनाथ आगीने (रा. कडधे) यांना दिली असून, त्या बदल्यात वरील मिळकती या आगीने यांनी गट नं. ९६ क्षेत्र ५१ आर,व गट नं.२०६ क्षेत्र १४ एकर ही मिळकत भोकरे यांना दिली होती.परंतु आगीने यांनी भोकरे यांची जमीन कागदोपत्री त्यांच्या नावे करून घेतली. स्वत:च्या मिळकती स्वत:च्याच नावे ठेवल्या. तीन गटाच्या ताब्यासाठी दि.२७ रोजी सकाळी ८.३० चे सुमारास फिर्यादी व त्यांची बहीण घरी असताना बाळू नथू पारखी (रा. ओझर्डे) हा त्याच्या एका मित्राला घेऊन भोकरे यांच्या घरासमोर आला व तुमचे ताब्यातील गट नं.११३,१२८,१२४ ही जमीन प्रसाद श्रीकांत टापरे व त्याची बहीण जुई मेडेकर (रा. रविवार पेठ, पुणे) यांचेकडून खरेदी केली आहे. त्या जमिनीचा ताबा तुम्ही सोडा, नाही तर तुमच्याकडे बघून घेईन, अशी धमकी दिली. फिर्यादीचे वडील घरात आल्यानंतर पारखींनी त्यांनाही दमदाटी केली. पुन्हा रात्री ९.३० ला पारखी धमकावून गेला. (वार्ताहर)
कडधेत शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: November 30, 2015 01:46 IST