पुणे : सांस्कृतिक शहरातील महोत्सवांतून तरुणांच्या ऊर्जेला वाट मिळत आहे. या उर्जेला कोंदण न मिळाल्यास ती असहिष्णू होईल. त्यामुळे कलेचे शिक्षण देणा-या संस्थांना शासनातर्फे अनुदान मिळायला हवे. पायाभूत सुविधांसाठीही शासनाने पुढाकार घ्यायला हवा, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केले. कला, गायन, वादन, संगीत नाट्य यांचा मनोहारी मिलाप असणा-या शनिवारवाडा कलामहोत्सवास दिमाखात प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उदघाटन सतीश आळेकर व ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी आळेकर बोलत होते.ते म्हणाले, ‘१९६१ मध्ये झालेल्या पडझडीतून पुण्याला पुनरुज्जिवीत करण्याची संधी राजकीय पक्षांना मिळाली होती. मात्र, त्यांनी ती दवडली. पूर्वी पुणे हे पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जायचे. आता ते शैक्षणिक संस्थांचे, तरुणांचे शहर बनले आहे. तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ललित कला केंद्रासारख्या संस्था कार्यरत आहेत. मात्र, ही प्रशिक्षण केंद्रे विनाअनुदानित तत्वावर चालवली जातात. त्यांना सरकारचे कोणतेही पाठबळ मिळत नाही. त्यासाठी शासनाने धोरण आखून अनुदान आणि पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करायला हवेत.आळेकर म्हणाले, ‘शहरामध्ये अनेक सभागृहे, प्रेक्षागृहे उभी राहत आहेत. चित्रपट, लघुपट, नृत्य, संगीत महोत्सव दिमाखदारपणे साजरे होत आहेत. प्रेक्षागृहांच्या देखभालही व्यवस्थित झाली पाहिजे. प्रत्येक तिकिटातला एक रुपया खर्च केला तरी निधी जमा होऊ शकेल. विंगेतील व्यवस्था चोख असेल तर नाटक रंगते. त्याचप्रमाणे सर्व सोयी सुविधा पुरवल्या तर महोत्सव आणि प्रयोग अधिक रंगतील. प्रत्येक प्रयोग अथवा कार्यक्रम झाला की स्वच्छता व्हायला हवी. कला ६० टक्के लोकाश्रयावर तर ४० टक्के शासनाच्या पाठिंब्यावर टिकते. त्यामुळे कला उजळण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.’ प्रभाकर जोग यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.या सोहळयात गायिका अनुराधा मराठे, तबलावादक राजू जावळकर तसेच संगीत क्षेत्रात कार्यरत असणा-या श्री संत दर्शन मंडळ संस्थेच्या श्रीराम राठे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अनुराधा मराठे म्हणाल्या, ‘केवळ गुरुंमुळे संगीताची अनेक वर्षे सेवा करण्याची संधी मिळालीआहे. कठोर परिश्रमाशिवाय कला साध्य होत नाही. नाटक, भाषेचा अभ्यास, अनुभव या सर्व कलांचा समुदाय संगीतात पहायला मिळतो. त्यामुळे ही कला कायम जोपासली गेली पाहिजे.’(प्रतिनिधी)
महोत्सवांतून तरुणांना ऊर्जा
By admin | Updated: December 25, 2015 01:39 IST