पुणे : जिल्ह्यातील वीज समस्येबाबत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी असंख्य तक्रारी मांडल्या. वादळात पडलेले पोल तसेच पडून आहेत, अडथळा ठरणारी झाडे कापली जातात, डीपी जळाल्याने गावे १५-१५ दिवस आंधारात असतात, खांबावर गावातील तरुणांना चढवून कामे करून घेतात... मग वायरमन काय कांदे काढायला जातात का? असा सवाल करण्यात आला.सर्वसाधारण सभेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. या वेळी सदस्यांनी आपापल्या भागातील तक्रार मांडल्या. मात्र, महावितरणचे मुख्य अधिकारी तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अधिकारी न आल्याने २० जून रोजी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले.मात्र, ज्या विभागातील अधिकारी आले होते, त्यांच्याकडे सदस्यांनी तकक्रारी मांडल्या. खेड तालुक्यातील सिद्धी गव्हाण, ठाकूरवाडी येथे आठवडाभर वीज नाही. वादळात पडलेले पोल तसेच पडून आहेत; मात्र महावितरण तक्रारी करूनही दखल घेत नाही, अशी विचारणा झाल्यानंतर दोन दिवसांत काम पूर्ण होईल, असे अश्वासन देण्यात आले. शिवसेनेचे कुलदीप कांडे यांनी, एकीकडे झाडे जगवा असे सांगितले जाते; मात्र दुसरीकडे अडथळा ठरणाऱ्या झाडांची महावितरण कत्तल करते. गरीब शेतकरी या झाडांना जिवापाड संभाळतात. मात्र, ती तोडताना महावितरण त्याचा विचार करीत नाही. तारांना झोळ आले आहेत, पोल जर्जर झाले आहेत, ते कधी पडतील याची शाश्वती नाही. त्यामुळे महावितरणने निदान पुढील पावसाळ्याच्या दिवसांत आपत्ती कक्ष उभारून तत्काळ वीजपुरवठा होईल, याची काळजी घ्यावी, अशी सूचना केली. वाफगावच्या वाकडवस्तीला वीज कनेक्शन नाही. (प्रतिनिधी)
वायरमन कांदे काढायला जातात का?
By admin | Updated: June 11, 2015 06:02 IST