पुणे : जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या तयारीसाठी तालुक्यात आढावा बैठका न घेताच जिल्हा स्तरावरील बैठक घेण्यात आली. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी न घालण्याची सूचना या वेळी केली.राज्यात खरीप हंगाम बैठकांना विशेष महत्त्व आहे. जिल्हा परिषद आणि कृषी अधीक्षक यांच्यामार्फत कृषी निविष्ठा, खते बी-बियाण्यांचा पुरवठा, पीककर्ज आणि वीजपंप जोडणी यांचा आराखडा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आणि आढावा यांसाठी तालुका स्तरावर आढावा बैठका पंचायत समितीत घेतल्या जातात. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर आढावा घेऊन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित बैठक घेऊन तो शासनाला सादर करण्यात येतो. या वेळी मात्र तालुका स्तरावरील खरिपाच्या बैठकाच घेतल्या गेल्या नाहीत. थेट पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप बैठकांबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांनाच अंधारात ठेवले. तालुका आढावा, शेतकऱ्यांची मागणी आणि मागील वेळी आलेल्या अडचणी तसेच पंचायत समिती सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक न घेता थेट जिल्ह्याची बैठक घेतली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वत:च केलेले नियोजन बैठकीत मांडले. प्रत्यक्षात गाव किंवा तालुका पातळीवरील अडचणींचा विचार या वेळी केला नाही. शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी प्रश्न उपस्थित करून कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच त्याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)- कृषी अधिकारी सर्वसाधारण सभेत उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी खुलासा केला.
चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका
By admin | Updated: April 16, 2017 03:56 IST