पुणे : मावळ तालुक्यात सुरू केलेल्या ‘ग्राम बालविकास केंद्रा’ला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, आता जिल्हाभर हा उपक्रम सुरू करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरविले आहे. मार्चअखेरपर्यंत कुपोषणमुक्त जिल्हा करण्यात येणार आहे. २ हजार ८७ बालकांना तीन महिन्यांत सर्वसाधारण गटात आणणार आहेत.१२ जानेवारी रोजी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असून, मार्चअखेरपर्र्यत जिल्हा कुपोषण मुक्त करण्याचे ठरविले असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले. २१ आॅक्टोबर २०१५ रोजी पुणे जिल्हा परिषद, महिला व बाल कल्याण विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनाच्या वतीने कुपोषण निर्मूलन अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. त्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी वर्षात जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्र्धार केला होता. लायन्स क्लबच्या माध्यमातून मावळ तालुक्यात सर्वप्रथम हा उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यातील तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित २३९ बालकांपैकी २०५ बालकांना सर्वसाधारण गटात आणण्यात आले. ३४ बालके ही आजारी स्वरूपातील असून, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा देऊन त्यांनाही सर्वसाधारण गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात २ हजार ८७ बालके ही तीव्र व मध्यम कुपोषित आहेत. त्यात ३२७ बालके तीव्र, तर १ हजार ७६0 बालके ही मध्यम कुपोषित आहेत. यांना सर्वसाधारण गटात आणण्यासाठी आता विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी तालुका, बीट व अंगणवाडी स्तरावर ही योजना राबविण्यात येणार आहे. यात लायन्स क्लब पोषक अन्नाचा पुरवठा करणार असून, जिल्हा परिषद आरोग्य विभाग औषधे पुरविणार आहे. (प्रतिनिधी)लायन्स क्लबच्या माध्यमातून या उपक्रमाला यश येत असून, त्यांच्या माध्यमातून जिल्हाभर ग्राम बालविकास केंद्र करून जिल्हा लवकरच कुपोषण मुक्त करू. आपल्या गावातील एकही मूल कुपोषित राहू नये, यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा.- कांतिलाल उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी
नवीन वर्षात जिल्हा कुपोषणमुक्त!
By admin | Updated: December 31, 2015 04:06 IST