मार्गासनी : धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना धरणग्रस्तांनी धानेप ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याप्रकरणी तब्बल पाच दिवसांनी चार जणांवर वेल्हे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात धरणग्रस्त समितीमधील कार्यकर्ते सागर सुरेश मळेकर, शिवाजी तानाजी रेणुसे, ज्ञानेश्वर जानू ओव्हाळ व मारुती दामू चोर (चौघेही राहणार धानेप, ता. वेल्हे) यांच्यावर अधिकाऱ्यांना कोंडून ठेवून, शासकीय कामात अडथळा आणून अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.या संदर्भात अधिक माहिती अशी, वेल्हे येथील चापेट धरणाचे काम पुन्हा चालू करण्यासाठी शासनपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. बुडीत क्षेत्रात येत असलेल्या कोदापूर, कानंद व भोसलेवाडी या गावांचे गावठाण पुनर्वसन धानेप गावामध्ये होत आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. याला धानेप गावामधील धरणग्रस्तांचा विरोध आहे. अद्याप पुनर्वसन झाले नाही तसेच धानेप गावामधील संपादित क्षेत्र हे बुडीत खाणीसाठी संपादित झाले आहे. ते पुनर्वसनासाठी घेऊ नये, तीन गावांचे गावठाण पुनर्वसन या ठिकाणी होऊ नये, धानेपमधील धरणग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने व्हावे, या त्यांच्या मागण्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर चर्चा करण्यासाठी नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बी. आर. पवार, व्ही. डी. नलावडे, भरत वायसे हे १८ एप्रिल रोजी धानेप येथे आले होते. त्यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या वेळी धरणग्रस्तांनी व ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. आमच्या मागण्यांबाबत मंत्रालयात किंवा मुंबईत बैठक न घेता येथे वेल्ह्यात बैठक घेण्यात यावी, आमच्या मागण्या जिल्हाधिकारी व संबधित अधिकाऱ्यांना पोचवण्याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. जोपर्यंत लेखी हमी देत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना कोंडण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी लेखी हमी दिल्यावर त्यांना सोडण्यात आले होते. या घटनेनंतर पाच दिवसांनी अभियंता पवार यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद घुगे व सहकारी पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
धानेपच्या धरणग्रस्तांवर पाच दिवसांनी गुन्हा दाखल
By admin | Updated: April 24, 2015 03:31 IST