निरवांगी : निमसाखर (ता. इंदापूर) येथील वीटभट्ट्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी असणाऱ्या अनधिकृत वीटभट्ट्या तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या १० जूनपर्यंत या अनधिकृत वीटभट्ट्या बंद न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. निमसाखर परिसरात अनधिकृत वीटभट्ट्या बंद कराव्यात यासाठी येथील ग्रामस्थ अरुण शंकर भोसले हे मागील दोन वर्षांपासून संबंधित सर्व खात्यांकडे अनेक वेळा निवेदन देत आहेत. भोसले म्हणाले, की विटा भाजण्यासाठी गंधक, कोळसा, राख आदींचा वापर करण्यात येत असतो. त्या मुळे मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो. वाढत्या प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधीचे निवेदन भोसले यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी यांना दिले होते. यावर प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. तहसीलदारांनी ग्रामसेवक व तलाठी यांना या वीटभट्ट्यांची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. यामध्ये प्रदूषण मंडळाचा ना हरकत दाखला, सार्वजनिक बांधकाम खात्याचा दाखला आदीची तपासणी करण्याची आदेश तलाठ्यांंना देण्यात आले आहेत. परंतु याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे दि. ११ पासुन उपोषणाचा इशारा अरुण भोसले यांनी दिला.
अनधिकृत वीटभट्ट्या बंद करण्याची मागणी
By admin | Updated: June 6, 2015 22:11 IST