पुणे : महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आघाडीसाठी मैत्रीचा हात पुढे करताना १६२ पैकी ७१ जागा लढविण्याचा प्रस्ताव देऊन छोट्या भावाची भूमिका स्वीकारायला तयार असल्याचे स्पष्ट केले. आघाडी होण्याची शक्यता कमी झाली असली तरी एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मानसिकता पाहता महापालिकेत क्रमांक एकचा पक्ष बनण्याऐवजी क्रमांक २ च्या जागा मिळविण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचे दिसून येत आहे.पुणे महापालिकेवर अनेक वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या काँग्रेस पक्षाने यंदा निवडणुकीपूर्वीच पालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याची आशा सोडून दिल्याचे चित्र दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेची सत्ता काँग्रेसकडून हिसकावून घेतली. त्यानंतर पालिकेच्या सत्तेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये वर्चस्वाची लढाई राहिली होती. सध्या महापालिकेत काँग्रेस पक्षाकडेच विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्येच सत्ता मिळविण्याची रस्सीखेच पाहायला मिळणे अपेक्षित होते.मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. पालिकेच्या सत्तेसाठी भाजपा व राष्ट्रवादीत चुरस असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शहरात काँग्रेस पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. पक्षाचा स्वत:चा असा परंपरागत मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. पुण्याने अनेक दिग्गज नेते देशाला दिले आहेत. मात्र या गौरवशाली परंपरेचा विसर काँग्रेसला पडल्यासारखे वातावरण यंदाच्या निवडणुकीत निर्माण झाले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आत्मचिंतन करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक होते. महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करायचीच या ईर्षेने काँग्रेस रणांगणात उतरणे अपेक्षित होते. प्रदेशपातळीवरून शहर काँग्रेसची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्यावर सामूहिकरित्या सोपविण्यात आली. मात्र सामूहिक जबाबदारीचे हा फार्म्युला तितकाचा यशस्वी झाल्याचा दिसून येत नाही. यामुळे काँग्रेस पक्षाचे पुण्याबाबतचे निर्णय वेगाने घेण्यात अडचणी येत आहेत.त्याऐवजी एकाच वरिष्ठ नेत्याकडे पुण्याची जबाबदारी दिली असती तर अधिक चांगल्या पद्धतीने काँग्रेसचे नेतृत्व पुढे येऊ शकले असते. पक्षाच्या मदतीला उभे राहण्याचा विसरकाँग्रेस पक्षाने आतापर्यंत शहरातील अनेकांना केंद्रात व राज्यात मंत्रिपद, आमदारकी, खासदारी तसेच महापालिकेची विविध पदे उपभोगण्याची संधी मिळवून दिली. मात्र आज पक्ष अडचणीत असताना त्यातले अनेक आजी माजी पदाधिकारी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी धावून येताना दिसून येत नाहीत. पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मानसिक, आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी या नेत्यांनी उचलणे आवश्यक होते, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.उर्वरित ९१ जागांवर द्यावे लागणार तुल्यबळ उमेदवारआघाडीमध्ये काँग्रेसला ७१ जागा सोडण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून राष्ट्रवादीला देण्यात आला होता. त्यामुळे या जागांसाठी काँग्रेसकडे निश्चितच सक्षम उमेदवार उपलब्ध आहेत. मात्र आता उर्वरित ९१ जागांवर तुल्यबळ उमेदवार देण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे. राष्ट्रवादी यंदा आघाडीसाठी आग्रही असतानाही काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य ठरविण्याची जबादारी पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.
निवडणुकीपूर्वीच काँग्रेस छोट्या भावाच्या भूमिकेत
By admin | Updated: February 2, 2017 04:08 IST